सध्या आंबा, काजूचा हंगाम सुरु होत असून, शेतीचा देखील हंगाम शेवटाला आला आहे. शेतीच्या कामाची लगबग सुरु असताना त्यामध्ये अनेक वन्यप्राण्यांच्या त्रासाला शेतकरी आणि बागायतदारांना सामोरे जावे लागत आहे.
जिल्ह्यातील गुहागरमधील ग्रामीण भागामध्ये रानरेडे आणि वानरांच्या वाढत्या उपद्रवाने तालुक्यातील बागायतदार आणि शेतकरी प्रचंड हैराण झाले आहेत. हाता तोंडाशी आलेला घास रानरेडे हिरावून घेत असल्याच्या हजारो तक्रारी प्रशासनाकडे जात आहेत. मात्र यावर कायमचा उपाय काय, असा संतप्त सवाल करत केरळ राज्याच्या धर्तीवर राज्यातही वानर आणि रानरेड्यांना उपद्रवी प्राणी म्हणून घोषित करा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून जोर धरत आहे.
जंगलतोडीमध्ये झाल्यामुळे वन्यप्राण्यांनी आपला मोर्चा मानवी वस्तीकडे वळवला असून,अशा नासधुसीच्या घटना दिवसागणिक घडतच आहेत. मात्र यामुळे सर्वसामान्य शेतकरी हवालदिल झाला आहे. एरवी हंगामी शेती करून पावटा, कुळीथ, तूर यांसह विविध प्रकारच्या भाज्यांची बागायत करणारे शेतकरी रानरेडे आणि वानरांच्या उपद्रवामुळे मागील सात ते आठ वर्षात भातशेती करण्यासाठी देखील धजावत नाहीत. घटलेल्या शेती क्षेत्रामुळे हे चित्र स्पष्ट होत आहे. यात प्रामुख्याने कोतळुक, वेळंब, कौंढर, मळण या गावात तर आता हंगामी शेतीच कोणी शेतकरी करत नसल्याचे चित्र दृष्टीस येत आहे. त्यामुळे वानर आणि रानरेडे यांच्याबाबतीत राज्य सरकारने कायमचा निर्णय घ्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
रानरेडे किंवा अन्य जंगली प्राण्यांनी शेती किंवा फळझाडांचे नुकसान केले तर एका झाडाला सरकारकडून पाचशे रुपये दिले जातात. त्यात पोटच्या मुलासारख झाडे किंवा शेतीची पोषण केल्याने शेतकऱ्याचे मोठं नुकसान होतं आहे. बागायतीसाठी लाखो रुपये खर्च करूनदेखील त्यातून काहीही नफा न येता प्रचंड नुकसान होत आहे. त्यामुळे तालुक्यातील बागायतदारदेखील प्रचंड संताप व्यक्त करत आहेत.
रविवारी पालपेणे येथील मधली वाडीमध्ये जंगलात रानरेडा दिसून आल्यामुळे या भागातील बागायतदारदेखील चिंतेत असून येथील युवा उद्योजक उमेश खैर यांनी वस्तीच्या शेजारी बिनधास्तपणे वावरणाऱ्या रानरेड्याचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून जीवापलीकडे जपलेल्या बागायतीबाबत चिंता व्यक्त केली.