कोरोनाच्या महामारीनंतर बळकट, सक्षम झालेल्या यंत्रणेमुळे सर्वसामान्यांचे जीवनमान सुरक्षित झाले होते. महामाराची लाट ओसरली आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्था पुन्हा एकदा व्हेंटिलेटरवर गेली. विविध प्रकारच्या तब्बल ९१ जागा रिक्त आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जागा शंभर टक्के भरल्या असल्या तरी आरोग्य विभागाचे तालुक्याचे प्रमुख असलेले तालुका वैद्यकीय अधिकारीपद रिक्त आहे. त्यामुळे तालुका आरोग्य विभागाचा कारभार प्रभारी आहे. डोंगराळ भाग असलेल्या राजापूर तालुक्यामध्ये विखुरलेली गावे आहेत. या गावांमधील सुमारे दीड लाख लोकसंख्येच्या लोकांचे आरोग्य सांभाळण्याचे महत्वपूर्ण काम आरोग्य विभाग सांभाळत आहे.
कोरोना महामारीमध्ये अन्य तालुक्यातील आरोग्य यंत्रणा कोलमडली असताना राजापुरातील आरोग्य यंत्रणा सक्षमपणे कार्यरत राहून लोकांचे आरोग्य सांभाळत होती. कोरोनाची लाट ओसरल्यानंतर मात्र, आरोग्य विभागाला अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे कारभार सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पुरेसा कर्मचारी वर्ग असल्यास सर्वसामान्यांना अधिक दर्जेदार सुविधा वा उपचार मिळणार आहेत. त्यामुळे रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
विभागाला स्वमालकीच्या इमारतीची प्रतीक्षा – लोकांचे आरोग्य सदृढ राखणाऱ्या आरोग्य विभागाचा कारभार मात्र गेल्या कित्येक वर्षापासून आपला संसार पंचायत समितीच्या येथील एकात्मिक महिला व बालविकास विभागाच्या इमारतीमधून हाकला जात होता. सद्यस्थितीमध्ये तो बचत गटाच्या विक्री केंद्राच्या इमारतीमध्ये आहे. आरोग्य विभागाला स्वमालकीची इमारत असणे गरजेचे आहे. मात्र त्याकडे लोकप्रतिनिधींसह वरिष्ठ विभागाकडून साफ दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे लोकांचे आरोग्य सांभाळताना आरोग्य विभागाचेच स्वमालकीच्या इमारती अभावी आरोग्य बिघडले तर ते सांभाळणार कोण? असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे.