मुंबई गोवा हा महामार्ग इतके वर्ष बनू शकला नाही त्यासाठी मी स्वतः जबाबदार आहे. मी त्यासाठी ‘कोणालाही जबाबदार धरणार नाही, असं खुद्द केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी एका मुलाखतीत बोलताना म्हटलं आहे. तसेच या डिसेंबर अखेरपर्यंत मुंबई गोवा महामार्ग बनवून पूर्ण होईल अशी ग्वाही नितीन गडकरी यांनी दिली आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाचा प्रश्न सध्या जोरदार चर्चेत आहे. मनसेने या मुद्यावरुन आंदोलन केल्यानंतर सरकारने हा महामार्ग लवकरात लवकर पूर्ण करण्याची घोषणा केली आहे. मात्र महामार्गाच्या कामाच्या दर्जावरून सातत्याने टीका केली जात आहे. अशातच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई गोवा महामार्गाबाबत महत्त्वाच वक्तव्य केलं आहे.
नागपुरात एका वृत्तपत्र समूहाच्या वतीने आयोजित “मनातले गडकरी” या मुलाखतीत मुलाखतकार प्रसिध्द अभिनेता प्रशांत दामले यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना नितीन गडकरी बोलत होते. मुंबई गोवा मार्गाचे काम पहिल्यांदा महाराष्ट्र सरकारला दिलं होतं. त्यानंतर बऱ्याच अडचणी आल्या. जागा हस्तांतरित करण्याच्या तक्रारी अजूनही येतात. त्यासाठी कोणाला जबाबदार धरत नाही. या रस्त्यासाठी मी ७५ ते ८० म्हणजे सर्वात जास्त बैठका घेतल्या आहेत. तरी पण मला म्हणावं तसं यश मिळालं नाही. यावर यावर्षी डिसेंबर महिन्याच्या आत मुंबई गोवा मार्ग पूर्ण होईल. मी मुंबई ते दिल्ली १३८० किलोमीटरचा रस्ता जवळपास पूर्ण केला. पण माझ्या घरासमोरचा दोन किलोमीटरचा रस्ता मी तेरा वर्षापासून बांधू शकलो नाही, अशी खंत त्यांनी मांडली.