रत्नागिरीमध्ये प्रथमच सागर महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. ओल्या वाळूला आकार देत त्यापासून साकारलेले आकर्षक आणि वस्तुस्थिती वर्णन करणारे वाळूशिल्प सर्वांचेच लक्ष वेधून घेत असते. अशी वाळूशिल्पे पाहण्याचे सौभाग्य रत्नागिरीकरांना मिळणार आहे. तालुक्यातील भाट्ये, मांडवी व अन्य समुद्रकिनाऱ्यांवर हि वालुशिल्पे पाहता येणार आहेत. मातीपासून मूर्ती साकारताना कलाकारांना जेवढी मेहनत घ्यावी लागते त्यापेक्षा खूप जास्त वेळ आणि मेहनत या वाळूशिल्पांसाठी लागते.
जानेवारी २०२३ मध्ये चार दिवस होणाऱ्या या महोत्सवाची जोरात तयारी सुरू झाली आहे. वाळूशिल्पामुळे या महोत्सवाची रंगत वाढणार आहे. आसमंत बेनेवोलन्स फाउंडेशन आणि किर्लोस्कर वसुंधरा, इकॉलॉजिकल सोसायटी आणि विवांत अनटेम्ड फाउंडेशन या सहयोगी संस्था आयोजित पहिल्या सागर महोत्सवात अनोखी वाळूशिल्प पाहण्याची पर्वणी विद्यार्थी, युवक आणि समस्त रत्नागिरीकरांना लाभणार आहे.
सागर महोत्सव १३ व १४ जानेवारी २०२३ आणि २१ व २२ जानेवारी २०२३ या चार दिवशी होणार आहे. यात वाळूशिल्पांचे प्रदर्शन होणार आहे. तसेच तज्ज्ञांसोबत पुळणी, खडकाळ किनारपट्टी व खारफुटी जंगलसफर, जागतिक कीर्तीचे लघुपट, संशोधक व तज्ज्ञांची भाषणे, छायाचित्रांचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील कला महाविद्यालये, कलाकार, मंडळे यांनी वाळूशिल्प साकारण्यासाठी आसमंत बेनेवोलन्स फाउंडेशनचे प्रमुख नंदकुमार पटवर्धन यांच्याशी त्वरित संपर्क साधावा. आलेल्या प्रवेशिकांमधून निवडक कॉलेज, कलाकार, मंडळांना संधी देण्यात येणार आहे. त्यामुळे मागील वर्षामध्ये जिल्ह्यात काही नवीन पहायला आणि अनुभवायला मिळणार याबाबत रत्नागिरीकरांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे, सागर महोत्सवाचे विशेष उत्साह सर्वत्र पहायला मिळत आहे.