नवीन शैक्षणिक वर्षाला गुरुवारी (ता. १५) पासून सुरवात झाली. शैक्षणिक साहित्याने बाजारपेठ गजबजली आहे. विद्यार्थी आणि पालकांची खरेदीसाठी बाजारात गर्दी होत आहे. यंदा शैक्षणिक साहित्याच्या किमतीत २५ ते ३० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे; मात्र पर्याय नसल्यामुळे पालकांना महागड्या शालेय वस्तू विकत घ्यावे लागत आहेत. काही व्यवसायिकांनी आपले साहित्य खपवण्यासाठी थेट शाळांशी संपर्क केला आहे. गेल्या वर्षी २०० रुपये डझन असणाऱ्या वह्या आता २५० रुपयांवर गेल्या आहेत तसेच ७ रुपयांना मिळणारा साधा पेन आता १० रुपयांना मिळत आहे. २५० रुपयांचे दप्तर ३०० रुपयांना झाले आहे. नामांकित कंपन्यांच्या वह्यांच्या दरात ३० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. इंधन दरवाढ, मजुरी वाढल्याने साहित्याच्या किमतीत वाढ झाली आहे. याबरोबरच विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी बस व रिक्षांच्या भाड्यातही वाढ करण्यात आली आहे. यामुळे पालकांना यंदा साहित्य खरेदी करताना महागाईची झळ सोसावी लागत आहे. व्यवसायासाठी काही दुकानदारांनी थेट शाळांशी संपर्क साधणे सुरू केले आहे.