कोकण रेल्वे प्रशासन कोकण रेल्वेमार्गावर धावणाऱ्या रेल्वेगाड्यांसाठी वर्षाला सात कोटी ३० लाख लिटर पाणी येथील वाहणाऱ्या वाशिष्ठी नदीतून उचलते. येथील पाणी बहुतांश रेल्वेगाड्यांमध्ये भरले जाते. पाण्यासाठी रेल्वेगाड्या थांबत असताना प्रवाशांसाठी थांबा का नाही, असा सवाल कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे उपस्थित केला आहे. या पत्रकात त्यांनी म्हटले आहे, की कोकणात चिपळूण रेल्वेस्थानकावर २५, तर मालवाहतुकीच्या किमान १० गाड्या थांबतात. जवळपास प्रवासी व मालवाहतूक अशा एकूण ३५ गाड्या येथून जाऊन-येऊन आहेत. चार वर्षांपूर्वी वाशिष्ठी नदीचे पाणी कोकण रेल्वेच्या गाड्यांमध्ये भरण्यासाठी घेऊ नये. असे ठरले असताना रेल्वे प्रशासनाने सहा कूपनलिका स्थानक परिसरात मारल्या आहेत. त्या सहाही बोरवेलचे पाणी रेल्वेगाड्यांना भरण्यासाठी कमी पडत होते.
त्यामुळे जलसंपदा विभागाकडून रेल्वे प्रशासनाने वर्षाला सात कोटी ३० लाख लिटर पाणी नदीतून उचलण्याची वर्षाला कोकण रेल्वे जलसंपदा विभागाला कर भरत आहे. कोकण रेल्वेसाठी जमीन, पाणी आमचे असल्याने वंदे भारत रेल्वेला चिपळूणच्या रेल्वेस्थानकावर थांबा मिळालाच पाहिजे अन्यथा जलसंपदा विभागाकडे रेल्वेसाठी जे पाणी दिले जाते ते बंद करण्याची मागणी करण्यात येईल व रेल्वेचे पाणी आम्ही बंद करू. जवळजवळ सर्व रेल्वेगाड्या चिपळूण स्टेशनवर पाणी भरण्यासाठी थांबतात मग थांबा देऊन प्रवासी का घेतले जात नाहीत ? कोकण रेल्वे तोट्यात आहे, असे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे. तोटा जर भरून काढावयाचा असेल तर ज्या गाड्या चिपळूणमध्ये पाणी भरण्यासाठी थांबतात त्यांना रितसर थांबा देऊन प्रवासी घेणे गरजेचे असल्याचेही मुकादम यांनी म्हटले आहे.