उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सर्वच सरकारी कार्यालयांची पाहणी केली असून, सुरुवात रत्नागिरी जिल्हाधिकरी कार्यालयापासून केली आहे. दुरवस्था झालेली स्वच्छतागृह, रहाट घर येथील रस्त्याची दुरावस्था व अस्वच्छता यांची प्रत्येक्ष पाहणी करून संबंधित विभागांना येत्या दोन दिवसात परिस्थिती सुधारण्याचे आदेश दिले.
त्याचप्रमाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या व्यवस्थापनाची झाडाझडती घेतली. जेवण पुरविणाऱ्या ठेकेदार कंपनीने हजेरी पटावर २३ कामगार दाखवून केवळ १० कामगारांना कामाला ठेवून काम करून घेत असल्याचे सत्य समोर आले. स्वच्छतेबाबत दक्ष राहण्याच्या सूचना त्यांनी कार्यरत कर्मचाऱ्यांना केल्या. कर्मचाऱ्यांनी आपल्याला वेळेवर आणि पुरेसे मानधन मिळत नसल्याची तक्रार केली. या प्रकरणी मंत्री सामंत यांनी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना जिल्हा शल्यचिकित्सकांना दिले आहेत.
मंत्री उदय सामंत रत्नागिरी दौऱ्यावर असताना त्यांच्याकडे विविध विभागातून अनेक तक्रारी आलेल्या, अखेर त्याची गंभीर दखल घेऊन त्यांनी त्याबाबत उलगडा आणि शहानिशा करण्यासाठी अचानक भेट देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट दिली. तेथील स्वच्छतागृहाच्या दूरवस्थेबाबत तक्रार होती. यावेळी तहसीलदार शशिकांत जाधव, बांधकाम विभागाचे अधिकारी सोबत होते. या स्वच्छतागृहांमध्ये पाणीच नसल्याने दुर्गंधी पसरली होती. परंतु, पालिकेचे कर्मचारी साफसफाई करण्यात दिरंगाई करतात असे समजले.
यावर मंत्री सामंत यांनी थेट मुख्याधिकाऱ्यांना फोन केला. त्यांचे प्रतिनिधी तत्काळ कार्यालयात दाखल झाले. उद्याच्या उद्या जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व स्वच्छतागृहांची साफसफाई झालीच पाहिजे. त्यानंतर दर दोन दिवसांनी पालिकेचे कर्मचारी ही साफसफाई करतील. त्यांचे योग्य मानधन तहसील कार्यालयाकडून दिले जाईल असे सांगितले.
त्यानंतर मंत्री सामंत थेट रहाटघरामध्ये पोहोचले. या बसस्थानकाच्या परिसरामध्ये मोठमोठे खड्डे आणि साचलेले पाणी होते. खूप अस्वच्छता दिसत होती, या कारभाराबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. दोन ते चार दिवसांमध्ये या सगळ्या परिस्थितीमध्ये सुधारणा झालीच पाहिजे, असे संबंधिताना ठणकावून सांगितले.