रत्नागिरी जिल्ह्यातील ७०७ शिक्षक अन्य जिल्ह्यात बदलीने जाणार आहेत. एकूण शिक्षकांच्या तुलनेत रिक्त पदांची संख्या १५ टक्के असून, बदल्या झाल्यास सुमारे २५ टक्के जागा रिक्त होतील. त्यामुळे रत्नागिरी जिल्हा परिषद प्राथमिक विभागाची अवस्था बिकटच होणार असल्याची चिन्हे दिसून येत आहेत.
जिल्हा परिषदेच्या २ हजार ४९४ प्राथमिक शाळांमध्ये ७ हजार २३२ शिक्षक पदे मंजूर आहेत. त्यापैकी ६ हजार १०० शिक्षक कार्यरत आहेत. १५ टक्के शिक्षकांची पदे रिक्त आहेत. आंतरजिल्हा बदली प्रक्रिया राबवताना दहा टक्केपेक्षा अधिक पदे रिक्त असलेल्या जिल्ह्यातील शिक्षकांना सोडू नये, असे आदेश दिले होते; मात्र नुकत्याच आलेल्या शासन आदेशानुसार आंतरजिल्हा बदल्या टप्प्याटप्प्याने करावयाच्या आहेत.
ऑनलाइन पद्धतीने २०१७ ते २०२२ या कालावधीत आंतर जिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. रत्नागिरी जिल्हा परिषदेत १५ टक्क्यांपेक्षा जास्त शिक्षकांची पदे रिक्त असतानाही शासनाने २०१७ ते २२ पर्यंत बदली झालेल्या ७०७ शिक्षकांना कार्यमुक्त करण्याचे आदेश दिल्याने अनेक शाळांमध्ये शिक्षक संख्या कमी राहिल्याने, अनेक अडचणी निर्माण होणार आहेत. त्यामुळे आरटीई अॅक्टचे निकष शासनाकडून धाब्यावर बसवून बदल्या केल्या जात असल्याचे पुढे आले आहे.
सध्या १ हजार १५० शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यात ७०७ शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीने कार्यमुक्त केल्यास त्यात मोठी भर पडेल. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. ही पदे तत्काळ भरली जावीत, अशी मागणी केली जात आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळांत शिक्षक कमी पडतील. त्याचा परिणाम शैक्षणिक गुणवत्तेवर होईल. आधी पदे भरा मगच कार्यमुक्ती द्या. अशी मागणी माजी शिक्षण सभापती दीपक नागले यांनी केली आहे.