संगमेश्वर तालुक्यातील निगुडवाडी आणि कुंडी या दोन गावांतील सुमारे ३०० हेक्टर जमीनीच्या व्यवहारात गैरव्यवहार झाल्याचे सकृतदर्शन दिसत नसून अनियमितता झाल्याचे निदर्शनास येत असल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने कोकण आयुक्तांकडे पाठवला असल्याचे खात्रीलायक गोटातून वृत्त आहे. चंद्रपूर येथील वीज निर्मिती प्रकल्पासाठी शासनाने अदानी कंपनीला ३०० हेक्टर जागा दिली. ही जागा वनविभागाची होती. नियमानुसार त्या बदल्यात ३०० हेक्टर जामा वनविभागाला परत करायची होती.
जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील कुंडी आणि निगुडवाडी येथील ३०० हेक्टर जागा वनविभागाला देण्यात आली होती. मात्र या संपूर्ण व्यवहारात मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप खा. विनायक राऊत यांनी केला होता. याप्रकरणी चौकशीसाठी १५ ऑगस्टला उपोषणही छेडले होते. पालकमंत्री उदय सामंत यांनी या प्रकरणी दोन अधिकाऱ्यांची निवड करुन चौकशीचे आदेश दिले होते.
या प्रकरणात वारस तपास जलदगतीने होऊन एका दिवसात ही जागा वनविभागाच्या नावे केली गेली. या जागेची मोजणीही करण्यात आलेली नाही. जमीन मालकांनी त्यावेळच्या चालू बाजारभावाप्रमाणे पैसे दिले गेल्याचे कागदोपत्री आहे. एकूणच या व्यवहारामध्ये गैरव्यवहार झाला नसल्याचे सकृतदर्शनी दिसत असून अनियमितता झाल्याचे निदर्शनास येत असून तसा अहवाल जिल्हा प्रशासनाने कोकण आयुक्तांकडे पाठविल्याचे समजते.