31.3 C
Ratnagiri
Monday, March 24, 2025

मुंबईसमोर चेन्नईचे फिरकीचे जाळे ? सलामीलाच आमनेसामने

सर्वाधिक आणि प्रत्येकी पाच वेळा आयपीएल जिंकणारे...

घरपट्टी थकवणाऱ्या ६४ मालमत्ता सील रत्नागिरी पालिकेची कारवाई

घरपट्टी वसुलीच्या दृष्टीने रत्नागिरी पालिका अॅक्शन मोडवर...

कोकणात लवकरच ‘मालवणी भाषा भवन’ उभारणार : ना. नितेश राणे

कोकण साहित्यिकांची भूमी आहे. अनेक साहित्यिक या...
HomeRatnagiriभाट्ये खाडी गाळाचा प्रश्न अधांतरीच

भाट्ये खाडी गाळाचा प्रश्न अधांतरीच

भाट्ये खाडीवर राजिवडा, कर्ला, भाट्ये, नवा फससोप या भागातील मच्छीमार अवलंबून आहेत.

भाट्ये खाडीमुखाजवळ मांडवी बंदरापर्यंत पुलापासून मोठ्या प्रमाणात गाळ साचल्यामुळे मच्छीमारी नौकांना कसरत करतच मार्ग काढावा लागत आहे. गेली काही वर्षे सातत्याने मागणी करूनही प्रशासन व लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्ष होत आहे. भाट्ये खाडीवर अवलंबून असणारे मच्छीमार सातत्याने मागणी करूनही हा प्रश्न अधांतरीच राहिलेला आहे. चार दिवसांनी मच्छीमारी हंगाम संपुष्टात येत असल्याने पुढील हंगामात तरी गाळाचा प्रश्न सुटणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. भाट्ये खाडीवर राजिवडा, कर्ला, भाट्ये, नवा फससोप या भागातील मच्छीमार अवलंबून आहेत.

मच्छीमारांच्या नौका समुद्रात नित्यनियमाने मच्छीमारीसाठी जात असतात; परंतु मागील अनेक वर्षांपासून येथील गाळाचा प्रश्न प्रलंबित आहे. मच्छीमारांकडून वारंवार गाळ उपशाची मागणी होते; परंतु आश्वासनांशिवाय त्यांच्या पदरी काहीच पडत नाही. त्यामुळे गतवेळी जमातुल मुस्लिमिन राजिवडा कोअर कमिटी पुरस्कृत मच्छीमार संघर्ष समिती गठित करण्यात आली होती. याबाबत आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता; परंतु त्या वेळीही आश्वासनाशिवाय काहीच पदरात पडले नाही. मांडवी बंदरातून समुद्रात ये-जा करण्यासाठी मासेमारी नौकांना समुद्राला येणाऱ्या भरतीची वाट पाहावी लागते.

या गाळामुळे अनेकदा नौका बुडून लाखो रुपयांचे मच्छीमारांचे नुकसान झालेले आहे शिवाय नौकांवरील खलाशी बुडाल्याच्या दुर्दैवी घटनाही येथे घडलेल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून मांडवी बंदरातील गाळ उपसा करण्याबाबत राजिवडा, कर्ला, फणसोप आणि भाट्ये येथील मच्छीमार संस्थांकडून मागणी करण्यात आलेली असतानाही त्याकडे शासनाकडून दुर्लक्ष करण्यात आले. त्याचे दुष्परिणाम म्हणून खाडी परिसरातील मच्छीमारांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. पुढील हंगाम सुरू होताना येथील गाळाचा प्रश्न मार्गी न लागल्यास आंदोलनाची तयारी आतापासूनच मच्छीमारांनी केली आहे.

जमातुल मुस्लिमिन राजिवडा कोअर कमिटीचे नजीर वाडकर, कार्याध्यक्ष इम्रान सोलकर, शब्बीर भाटकर यांच्या माध्यमातू पाच गावांमध्ये जनजागृती करून संघर्ष उभा करण्यात आला. आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता. या वेळी लवकरच गाळ काढण्याचे आश्वासन मिळाले; परंतु आता तीव्र लढा उभा करण्याच्यादृष्टीने मच्छीमारांनी हालचाली सुरू केल्या आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular