तालुक्यातील रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट गुरांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, त्याबाबत तत्काळ उपाययोजनांबाबत ठोस निर्णय होऊन त्याची अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते यांनी प्रशासनाकडे केली आहे. याबाबत तहसीलदार, पोलिस निरीक्षक, गटविकास अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देण्यात आले. राष्ट्रीय महामार्ग, राज्यमार्ग आणि प्रमुख रस्त्यांवर दिवसेंदिवस वाढणारा मोकाट गुरांचा प्रश्न आता गंभीर टप्प्यावर पोहोचला आहे. दोन दिवसांपूर्वी मोकाट गुरांच्या प्रश्नावर महामार्गावर आंदोलन झाले होते. त्यानंतरही रस्त्यावर येणाऱ्या गुरांमुळे अपघातांची मालिका सुरू राहिलेली आहे. त्यामध्ये वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होताना मुक्या जनावरांचा नाहक बळी गेला आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी तहसीलदार, पोलिस निरीक्षक, गटविकास अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागप्रमुखांना भेट देत निवेदन दिले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजन लाड, शरद पळसुलेदेसाई, प्रकाश नाचणेकर, संतोष मोंडे, अरविंद लांजेकर, आशिष मालवणकर, फारुख साखरकर, प्रल्हाद तावडे, संतोष तांबे, संकेत शिवणेकर आदी उपस्थित होते.
प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे – राजापूर तालुक्यात रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या मोकाट गुरांचा प्रश्न गंभीर बनला आहे. यामुळे वाहतूक कोंडीबरोबर अपघाताचे प्रसंग घडू लागले आहेत. त्याचा फटका वाहनधारकांसह मुक्या जनावरांनाही बसू लागला आहे. याबाबत वारंवार तक्रारी, आंदोलने आणि निवेदन देऊनही अद्याप ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे तालुक्यातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. आता तरी प्रशासनाने गांभीर्याने लक्ष घालून याबाबत ठोस निर्णय घ्यावेत, अशी मागणी तालुकावासीयांकडून केली जात आहे.

