राज्यात शिंदे-फडणवीस सरकार येऊन साधारण दीड महिना पूर्ण झाला असून कालपासून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. परंतु राज्यात उप मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेल्या देवेंद्र फडणवीस यांना पक्षनिष्ठेचं फळ लवकरच मिळाल्याची चर्चा रंगली आहे. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना आता केंद्रात देखील स्थान मिळालं आहे. दरम्यान, राज्यातून फडणवीसांना स्थान देण्यात आलं असल्याची भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने आज घोषणा केली आहे.
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी आज पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची घोषणा केली. यामध्ये देशभरातील भाजपाच्या १५ बड्या नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. समितीच्या अध्यक्षपदी जे.पी.नड्डा यांचा समावेश करण्यात आला आहे. तर सदस्यपदी पीएम नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, बीएस येदीयुरप्पा, के.लक्ष्मण, इकबाल सिंह लालपुरा, सुधा यादव, सर्वानंद सोनोवाल, सत्यनारायण जटीया, भुपेंद्र यादव, देवेंद्र फडणवीस, ओम माथुर, श्रीमती वनथी श्रीनिवास यांचा समावेश आहे. तर सचिवपदी बी.एल संतोष हे असणार आहेत.
दरम्यान, भाजपच्या संसदीय समितीची घोषणा करण्यात आली असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना मात्र त्यातून वगळण्यात आलं आहे. पक्षाने संसदीय मंडळ या आपल्या सर्वोच्च धोरण निर्धारक समितीत केंद्रीय मंत्री आणि माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांना स्थान दिले नाही. नितीन गडकरी यांनी २४ दिवसांपूर्वी म्हणजे २४ जुलैला नागपूरमधील एका कार्यक्रमात ‘आता राजकारण सोडावेसे वाटते,’ असे वक्तव्य केले होते. गांधींच्या काळात राजकारण देश, समाज आणि विकासासाठी होत होते, पण आता राजकारण फक्त सत्तेसाठी केले जाते. गडकरी यांच्या या वक्तव्याला अद्याप एक महिनाही पूर्ण झाला नाही तोच पक्षाच्या सर्वात शक्तिशाली समिती म्हणजेच केंद्रीय संसदीय मंडळातून गडकरी यांना वगळण्यात आले आहे.