रत्नागिरीमध्ये माशांची आवक वाढायला सुरुवात झाली असून, ताजी फडफडीत विविध प्रकारची पकडण्यासाठी मच्छीमारांची लगबग सुरु झालेली दिसून येत आहेत. एक ऑगस्ट पासून सर्वत्र जिल्ह्यात मासेमारीला सुरुवात करण्याची परवानगी मिळाली आहे. परंतू, समुद्रात वादळाची परिस्थिती निर्माण झाल्याने नौका अजून किनाऱ्यावरच आहेत. मुसळधार पाऊस, वेगवान वारे त्यामुळे नौका पाण्यावर स्थिरावताना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत असल्याने परवानगी असून देखील मासेमारी नेमकी कधी करायची याबाबत संभ्रमाची अवस्था मच्छीमार व्यावसायिकांची निर्माण झाली आहे.
रत्नागिरीत समुद्र किनार्यापासून १० ते १२ वावात म्हाकूळ चांगल्या प्रकारे मिळत असल्याने जयगडपासून हर्णैच्या समुद्रात मच्छिमारांनी धाव घेतली आहे. मंगळवारी २०० ते ४०० किलो म्हाकूळ मिळाला आहे. मात्र उर्वरित मासळीचे प्रमाण कमी असल्याने त्यांचे दर वधारलेले आहेत. समुद्रात पाण्याला करंट असल्यामुळे ट्रॉलिंग वगळता गिलनेटसह छोटे मच्छिमार मासेमारीला जाण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
हर्णैतील मच्छिमारांना मासळी शोधत सिंधुदुर्गपर्यत जावे लागत आहे, तर रत्नागिरीतील काही मच्छीमार दहा ते बारा वावात जाळी टाकत आहेत. मिर्यापासून पुढे समुद्रात मंगळवारी सायंकाळी म्हाकुळ जास्त मिळत असल्याची माहिती मिळताच मच्छिमारांनी आपल्या नौका त्या दिशेने रवाना करत समुद्रात धाव घेतली आहे.
एक तर सध्या श्रावण महिना सुरु असल्याने अनेकांची व्रत वैकल्ये सुरु असल्याने संपूर्ण महिना शाकाहार केला जातो. त्यामुळे, मासळीचे दर सुद्धा आवाक्यात आहेत. बांगडा किलोला २०० रुपये, टायनी चिंगुळ ३५० रुपये किलो, रेणवी ६०० रुपये किलो, तर पापलेट ७०० रुपये किलोला दर मिळत आहे. त्यामुळे खवैय्यांची एक प्रकारे चंगळ झाली आहे.