वातावरणाला पूरक, अधिक उत्पन्न देणारी केरळमधील ‘केरा केरलम’ या नारळाच्या वाणाची कोकणात लागवड करण्यासाठी परभणी येथे झालेल्या ५३ व्या संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीने मान्यता दिली आहे. कोकणातील जमिनीत आणि येथील वातावरणात केरा केरलम जातीची लागवड यशस्वी होते, यावर गेली चौदा वर्षे रत्नागिरीतील भाट्ये नारळ संशोधन केंद्रात संशोधन सुरू होते. कोकणात विकसित झालेल्या प्रताप, बाणवलीप्रमाणे केरा केरलममधून वर्षाला ११८ नारळाचे उत्पादन मिळणार आहे. नारळ हा कल्पवृक्ष म्हणून परिचित आहे. जगामध्ये ९० हून अधिक देशात नारळ पीक घेतले जाते. भारतामध्ये नारळ पिकाखाली २१.९० लाख हेक्टर क्षेत्र असून, उत्पन्न २१ हजार २०७ दशलक्ष नारळ उत्पादन आहे. जगाच्या उत्पन्नाच्या एकूण ३१ टक्के उत्पन्न भारतात होते. भौगोलिक क्षेत्रात भारताचे स्थान १७.१५ तृतीय क्रमांकावर असले तरीही उत्पन्नात प्रथम क्रमांक आहे. महाराष्ट्र राज्यात नारळाचे उत्पादन मुख्यत्वे कोकण किनारपट्टीवर घेतले जाते. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नारळपिकाखाली क्षेत्र अधिक आहे. अलीकडच्या काळात पश्चिम महाराष्ट्रात क्षेत्र विस्तार होत आहे. कोकणात पारंपरिक बाणवली या उंच माडाची लागवड झालेली आहे.
नारळाचा वापर शहाळे, ओले खोबरे, तेल काढणे, काथ्या उद्योगासाठी करण्यात येतो. भाट्ये येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठातील प्रादेशिक नारळ संशोधन केंद्राने २०११ पासून भारतात विकसित झालेल्या विविध नारळ जातींचा तुलनात्मक अभ्यास केंद्रावर सुरू केला. या प्रयोगाच्या निष्कर्षानुसार, नारळाच्या अधिक उत्पादन देणाऱ्या ‘केरा केरलम’ हे वाण आशादायी आढळून आले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे झालेल्या ५३ व्या संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीमध्ये नारळामधील ‘केरा केरलम’ या वाणाची लागवडीस शिफारस करण्यात आली आहे. या नारळाची वैशिष्ट्ये म्हणजे प्रतिमाड प्रतिवर्ष ११८ फळांचे सरसरी उत्पादन असून, खोबरे प्रतिनारळ १७० ग्रॅम, तेलाचे प्रमाण ६९ टक्केइतके आहे. तसेच त्याच्या उत्पन्नामध्ये सातत्य आहे. हे वाण शिफारशीत करण्याच्या संशोधन कार्यात डॉ. दिलीप नागवेकर, डॉ. राजन खांडेकर, डॉ. वैभव शिंदे, डॉ. किरण मालशे, डॉ. सुनील घवाळे, डॉ. संतोष वानखेडे, डॉ. पराग हळदणकर यांचे योगदान आहे.