जिल्ह्यात मागील आठवड्यामध्ये परतीच्या पावसाने जोरदार धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. त्यात हळव्या भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यावर्षी पाऊस चांगला झाल्याने हळवी शेती वेळीच कापणीयोग्य झाली आहेत. गणपती उत्सव संपल्यावर शेतकरी हळव्या शेतातील पीक खळ्यात घेण्याच्या तयारीत असतानाच परतीच्या पावसाने धुमाकूळ घालायला सुरवात केल्याने सर्व पिकं आडवी झालेली पाहून शेतकरी हवालदिल झाला आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे होणारे शेतीचे नुकसान शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू दाटले आहेत.
कोकणातील जी शेती वरकस असते म्हणजे ज्या शेतीमध्ये उशिरापर्यंत पाणी साचून राहत नाहीत त्या शेतीमध्ये जी शेती केली जाते त्या शेतीला हळवी शेती म्हटले जाते तर पाणथळ शेतांमध्ये केल्या जाणाऱ्या शेतीला महान शेती असे संबोधले जाते. गणेशोत्सव संपता संपता हळवी शेती कापणीला येते. कोकणात भात आणि नाचणी ही दोन पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. यावर्षी पाऊस दमदार झाल्याने हळवी पिके वेळेत कापणीला आली आहेत. परंतु, गेले चार दिवस कोसळत असलेल्या पावसामुळे शेतीत पाणी साचून पिकलेल्या पिकांचे नुकसान होऊ लागले असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
गेली दोन एक वर्षे कोकणातील शेतकऱ्यांना लहरी निसर्गाचा चांगलाच फटका बसला आहे. २००५ साली कोकणात अतिवृष्टी झाली या मध्ये कोकणातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, शेती वाहून गेली, शेतीचे बांधबंधारे तुटले, कसदार शेतात नदीतील गाळ बसल्याने, सुपीक शेतं नापीक झाली. शेतकऱ्यांनी काबाडकष्ट करून शेतातील दगडमाती काढली, बांधबंधारे पुन्हा बांधून घेतले मात्र २०२१ साली कोकणात पुन्हा अतिवृष्टी झाली आणि पुन्हा एकदा कोकणातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले
गेले काही दिवस मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळत असलेल्या परतीच्या पावसाने उघडीप दिली तर शेतकऱ्यांच्या हाती चार दाणे येतील मात्र निसर्गाचा हा लहरीपणा असाच सुरु राहिला तर मात्र शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे.