महाराष्ट्राच्या सागरी जलाक्षेत्रात मासेमारी करण्याचा कालावधी प्रत्येक प्रकारच्या मासेमारीसाठी ठरवून दिलेला असतो. त्यामध्ये १ जून ते ३१ जुलैपर्यंत राज्यात सागरी क्षेत्रात संपूर्ण मासेमारी बंद असते. १ ऑगस्ट रोजी पारंपारिक पद्धतीने केली जाणारी मासेमारी सुरु केली जाते तर पर्सेसिन मासेमारी १ सप्टेंबर रोजी सुरु होते. सध्या कोकणातील समुद्रात परवानगी नसून देखील अनधिकृतपणे पर्सेसिन मासेमारी केली जात आहे. रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्री क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अनधिकृत पर्सेसिन मासेमारी सध्या सुरु आहे. मत्स्य विभाग त्या त्या भागात गस्ती नौका नसल्याने कारवाई करत नसल्याची कारण समोर करत आहेत.
राज्यात पर्सेसिन मासेमारी १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत केली जाते. मात्र कोकण किनारपट्टीवर सध्या अनधिकृत पर्सेसिन मासेमारी मोठ्या प्रमाणात केली जाते. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यात अनधिकृत पर्सेसिन मासेमारीला ऊत आला असून यावर मत्स्य विभागाचा अंकुश नसल्याने त्यावर कारवाई सुद्धा होत नाही.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोन पर्सेसिन बोटीवर कारवाई केली असून त्यामधून ४० ते ४५ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. अनधिकृत मासेमारीवर कडक कारवाई केली जाते. बोटीवर असलेल्या माशांच्या पाच पट रक्कम आणि पाच हजार रुपये अशी कारवाई केली जात असली तरी मोठ्या प्रमाणात अनधिकृत पर्ससिन मासेमारी केली जात आहे. रत्नागिरीमध्ये मात्र पारंपारिक मच्छी व्यावसायिकांनी अनेक वेळा आंदोलन करून, शासनाला निवेदन देऊन देखील चोरी छुप्या पद्धतीने पर्सेसिन प्रकारची मासेमारी सुरूच आहे. आणि नवीन कायद्याप्रमाणे त्यांच्यावर तत्काळ कडक कारवाई होण्याची मागणी जुने व्यवसायिक करत आहेत.