शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी सांगोला येथे झालेल्या शिवसेनेची सभेमध्ये, विरोधकांवर कडाडून प्रहार केला आहे. ते म्हणाले, ईडीचा वापर करून विरोधी पक्ष संपविण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज्यातील सरकार फार काळ टिकणार नाही. मध्यावधी निवडणुका कधीही होऊ शकतात, असा ठामपणे दावा त्यांनी केला आहे.
खासदार विनायक राऊत पुढे म्हणाले, केंद्र सरकारकडून ज्या पद्धतीने विरोधी पक्षांना नामशेष करण्यासाठी सत्तेची कटपुतली बनवून दुरुपयोग केला जातोय, अशा प्रकारची धरपकड उभ्या आयुष्यात पहिली नाही. हि तर एक प्रकारे, इंदिरा गांधी यांच्या आणीबाणीपेक्षाही हुकूमशाहीकडे वाटचाल सुरू झाली आहे. आणि त्यासाठी ईडीचा पुरेपूर वापर केला जात आहे, अशी जहरी टीकाही त्यांनी केली. या पुढच्या निवडणुका काँग्रेस राष्ट्रवादी सोबत लढण्याचे आज तरी ठरले नाही, परंतु आजतरी महाविकास आघाडी एकत्र आहे.
शिवसेना संपवणारा माणूस अजून जन्मालाच आलेला नाही. भाजपच्या त्रासाला कंटाळून नितीश कुमार आता भारतीय जनता पक्ष सोडून गेले, तसे शिवसेनेला परिणाम भोगावे लागणार नाही. सुशील मोदी किंवा आणखी कुणीच शिवसेना संपवू शकणार नाहीत. अशी खोचक टीका विनायक राऊत यांनी केली आहे.
सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी जो काय निर्णय घ्यायचा असेल तो तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते एकत्र बसून घेतील. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीबाबत अशाच पद्धतीने निर्णय होईल. सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांच्या टीकेला उत्तर देण्याएवढे ते मोठे नाहीत. शिवसैनिकच त्यांना त्यांची जागा दाखवतील, त्यांचे डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही, अशी टीकाही खासदार विनायक राऊत यांनी केली.