रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर समुद्रकिनारी शुक्रवारी ८ वाजता संशयास्पद बोट आढळून आल्याने सुरक्षा यंत्रणेत एकच खळबळ उडाली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सागरी जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. हरिहरेश्वर येथे वाहत आलेल्या स्पीड बोटमध्ये समुद्र किनारी AK 47 आणि काही जिवंत राउंड सापडले आहेत. त्यामुळे सर्व मच्छीमार बांधव व मच्छीमार सहकारी संस्था तसेच नागरिकांनी सतर्क रहावे व काही माहिती मिळाल्यास किंवा संशयस्पद गोष्ट आढळल्यास तात्काळ सागरी पोलीस ठाणे येथे संपर्क साधावा असे आवाहन मत्स्यव्यवसाय विभाग सिंधुदुर्गने केले आहे.
हरिहरेश्वर येथे समुद्रात शस्त्रास्त्रांनी भरलेली बोट आढळल्यानंतर संपूर्ण कोकण किनारपट्टीवर हायअलर्ट देण्यात आला आहे. कोकण किनारपट्टीवर पोलीस बंदोबस्त वाढवला, रत्नागिरी जिल्ह्यात नाकाबंदी करण्यात आली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील ४१ लँडिंग पॉईंटवर पोलिस नजर ठेवून आहेत. तर किनारपट्टी भागातील पोलीस स्थानकाअंतर्गत कडक नाकाबंदी सुरू असून प्रत्येक वाहनाची कसून चौकशी केली जात आहे. तर समुद्रात कोस्टगार्ड, पोलीस यांच्याकडून नौकांची कसून तपासणी सुरू असून तटरक्षक दलामार्फत जिल्ह्याच्या किनारपट्टीवर हेलिकॉप्टरद्वारे गस्त घालण्यात आली आहे.
रात्री उशिरापर्यंत जिल्ह्याच्या किनारपट्टीवर कोणतीही संशयास्पद वस्तू आढळलेली नव्हती. हरिहरेश्वर नजिकच्या समुद्रात लेरिहान ही नौका आढळली होती. या नौकेत शस्त्रास्त्र असल्याने सुरक्षा यंत्रणांची चांगलीच तारांबळ उडाली, राज्याच्या गृहविभागाने किनारपट्टीवर हायअलर्ट जारी केल्यानंतर पोलीस, कोस्टगार्ड, तटरक्षक दल सतर्क झाले आहेत.
दरम्यान रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. समुद्रकिनारच्या गावांमध्ये दुपारपासून पोलिसांची गस्त वाढली आहे. ठिकठिकाणी पोलीस, होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत.