कोरोना काळामध्ये रेल्वेची सेवा बंदच ठेवण्यात आली होती. त्यामुळे त्या काळामध्ये कोरोना चाचणी आणि निर्बंधांमुळे अनेक जणांनी प्रवास करणेच टाळले होते. परंतू आता कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने रेल्वेच्या गाड्या पूर्ववत सुरु झाल्या आहेत. त्यामुळे कोरोनामध्ये वाढलेले तिकीट दर देखील आत्ता पूर्ववत होत आहेत. दोन वर्षामध्ये सगळ्या सणांना मुकलेल्या चाकरमान्यांनी या वर्षी मात्र वर्षभर अगोदर पासूनच तिकीट बुकिंग करण्यास सुरुवात केली आहे.
आता सुरु झालेल्या उन्हाळी सुट्ट्या लक्षात घेता, रेल्वेला होणारी गर्दी पाहून रेल्वे प्रशासनाने देखील जादा गाड्यांची सुविधा उपलब्ध केली आहे. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेत मध्य रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस आणि थिविम तसेच मुंबई आणि मनमाड दरम्यान उन्हाळी विशेष गाड्या चालवण्यात येत आहेत. मुंबई- थिविम उन्हाळी विशेष गाड्या (२०फेऱ्या) लोकमान्य टिळक टर्मिनस – थिविम उन्हाळी विशेष ट्रेनला ६ मे पासून ते २४ मे पर्यंत (१० फेऱ्या) एक दिवसाआड चालविण्याकरीता मुदतवाढ देण्यात आली आहे. थिविम – लोकमान्य टिळक टर्मिनस उन्हाळी विशेष ट्रेनला ७ मे पासून २५ मेपर्यंत (१०फेऱ्या) एक दिवसाआड चालविण्याकरीता मुदतवाढ देण्यात आली आहे.
कोरोनाच्या महामारीमुळे गेली दोन वर्षे कोकणात गावी येऊ न शकलेल्या चाकरमान्यांनी आत्तापासूनच गणेशोत्सवात गावी येण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे २७ ऑगस्ट ते १ सप्टेंबर पर्यंत कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या सर्व गाड्यांची तिकिटे हाउस फुल्ल झाली आहेत. रेल्वेचे तिकीट न मिळालेल्या प्रवाशांना आता जादा सोडण्यात येणाऱ्या एक्सप्रेस गाड्यांची प्रतीक्षा आहे. यंदा उच्चांकी संख्येने चाकरमानी सिंधुदुर्गात येण्याची शक्यता आहे. यंदा ३१ ऑगस्टला गणेश चतुर्थी आहे. त्यामुळे २७ ऑगस्टपासूनच चाकरमान्यांनी कोकणात येणाऱ्या सर्व गाड्यांची तिकीटे बुक झाली आहेत.