बुधवारी पहिल्या कंटेनरमधून गद्रे कंपनीतील माल रवाना झाल्याचे कोकण रेल्वेचे संचलन विभागाचे संचालक संतोषकुमार यांनी सांगितले. त्यामुळे यामध्ये रत्नागिरी ते जेएनपीटी कंटेनर ट्रेनसाठी लागणाऱ्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. कोकण रेल्वेत आल्यानंतर महामार्गावर कंटेनरची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याचे पाहायला मिळत होते. हेच कंटेनर रेल्वेने नेणे शक्य आहे का, यावर विचार सुरू झाला. कोकण रेल्वेच्या रत्नागिरीतील पथकाने ते शक्य करून दाखवले
प्रधानमंत्री गतिशक्ती योजनेतून आंग्रे पोर्ट, जेएसडब्ल्यू पोर्ट भोके स्थानकाशी, तर न्हावाशेवा बंदराजवळील एमआयडीसीतील वाहतूक वीर स्थानकाशी कोकण रेल्वेला जोडण्याचे दोन मोठे नवीन मार्ग प्रस्तावित केले आहेत, तसेच वर्षभरात १८ कोटी ४० लाख रुपये खर्च करून रत्नागिरी स्थानकात शीतगृह उभारण्यात येणार असल्याची माहिती कोकण रेल्वेचे संचलन विभागाचे संचालक संतोषकुमार झा यांनी दिली. कोकण रेल्वे मार्गावर सुरू करण्यात आलेल्या कंटेनर ट्रेनच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
ते म्हणाले, ‘‘रत्नागिरीतून वातानुकूलित आणि ड्राय दोन्ही प्रकारचे कंटेनर पाठवले जाणार आहेत. वातानुकूलित कंटेनरमधील तापमान १८ अंश सेल्सिअसपेक्षा कमी ठेवण्यासाठी प्रत्येक ठिकाणी पॅनल लावले आहेत. त्यामुळे मासळी, द्राक्षासह अन्य विविध प्रकारची उत्पादने खराब न होता वाहतूक करता येतील. रत्नागिरी स्थानकात कंटेनर ट्रेन उभी करण्यासाठी लांबलंचक रेल्वे रूळांची वेगळी व्यवस्था आहे. पुढील सहा महिन्यात फक्त कंटेनर ट्रेनसाठी वेगळे रूळ टाकून वेगळी मार्गिका रत्नागिरी स्थानकात उभारली जाणार आहे.
कोकण रेल्वे मार्गावर दोन मोठे प्रकल्प उभारण्यासंदर्भात संतोषकुमार म्हणाले, ‘‘रत्नागिरी ते रोहा या कोकण रेल्वे क्षेत्रामध्ये बंदर जोडण्यासाठी दोन प्रकल्प प्रधानमंत्री गतिशक्ती योजनेंतर्गत हाती घेण्यात येणार आहेत. त्यामध्ये रत्नागिरी स्थानकापासून जवळच असलेल्या भोके स्थानकाजवळ आहे. आंग्रे पोर्ट, जेएसडब्ल्यू पोर्ट येथून येणाऱ्या मालाची वाहतूक होणार आहे. तसेच वीर स्थानकाजवळ दुसरा मार्ग जोडला जाणार असून न्हावाशेवा बंदराजवळ विकसित होत असलेल्या औद्योगिक वसाहतीसाठी उपयुक्त ठरणार आहे.