होळी सणासाठी कोकण रेल्वे मार्गावर प्रशासनाने सोडलेली होळी स्पेशल (गाडी नं.०१११०) या गाडीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे शनिवारी मोठे हाल झाले. चिपळूण ते पनवेल असा तब्बल सहा तासांचा प्रवास या प्रवाशांच्या नशिबी आल्याने त्यांनी रेल्वे प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला. कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या सर्वच विशेष गाड्या उशिराने धावत आहेत. त्यामुळे चाकरमान्यांना त्याचा फटका बसत आहे. प्रत्येक सण, उत्सव हंगामात कोकण रेल्वे मार्गावर स्पेशल गाड्या सोडण्यात येतात.
साहजिकच त्या पद्धतीने तिकीट दर आकारणी केली जाते. प्रवास सुखकर व जलद व्हावा, यासाठी कोकणातील असंख्य प्रवासी अशा स्पेशल गाड्यांनी प्रवास करतात. हंगामात अधिक गाड्या सोडल्याने वेळापत्रक कोलमडणे, गाडी उशिरा सोडणे, तासनतास गाडी क्रॉसिंगच्या निमित्ताने उभी करून ठेवणे व इतर मागील गाड्यांना पुढे पाठवणे असे प्रकार कोकण रेल्वेचे नेहमीच सुरू असतात. असाच अनुभव गावाला होळी सणाला आलेल्या अनेक प्रवाशांना ३० मार्चला परतीच्या प्रवासादरम्यान आला.
थिविम ते पनवेल या आरक्षित होळी स्पेशल गाडीची चिपळूण स्थानकात येण्याची वेळ ही संध्याकाळी ४ वाजून ९ वाजताची असताना ती रात्री ९ वाजता आली आणि अर्धा तास स्थानकात थांबून ९.३० वाजता पनवेलच्या दिशेने निघाली. तब्बल पाच तास उशिराने आलेली ही गाडी पनवेल स्थानकात पहाटे ३.१५ वाजता आली. त्यामुळे अगोदरच ताटकळत बसणाऱ्या प्रवाशांना या गाडीच्या प्रवासाचा मोठा मनःस्ताप झाला. अनेक प्रवाशांनी कोकण रेल्वे प्रशासनाच्या नावाने शिमगा केला.