गेले वर्षभर कमी अधिक प्रमाणामध्ये लॉकडाऊनची प्रक्रिया सुरु आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता, शासनाने फक्त अत्यावश्यक सेवा सुरु ठेवून बाकी सर्व बंद करण्याचे आदेश दिले. अत्यावश्यक सेवांमध्ये पण बर्याच प्रमाणामध्ये अटी आणि शर्थी लागू करण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागामध्ये वाहतुकीसाठी एस.टी. वरच जास्त प्रमाणात लोक अवलंबून असतात. परंतु कोरोना काळामध्ये एस.टी सुद्धा बंद करण्यात आल्याने लोकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. परंतु, कालांतराने कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याचे निदर्शनास आल्यावर शासनाने एस.टीच्या काही फेर्या सुरु केल्या, जेणेकरून ग्रामीण भागातील लोकांना अत्यावश्यक गोष्टींसाठी प्रवास करणे सोयीचे ठरेल.
रत्नागिरीमधील राजापूर तालुक्यामध्ये राज्य परिवहन मंडळाकडून एक आगळी सेवा सुरु करण्यात आली आहे. कोरोनामुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी राज्य परिवहन मंडळ नवनवीन सुविधा अथवा उपक्रम राबविताना दिसते. यावेळी लालपरी बागायतदारांच्या मदतीला धावून गेली आहे. राज्य परिवहन मंडळाने ज्या जुन्या झालेल्या बसेस आहेत त्यांचे रुपांतर महाकार्गो मालवाहू ट्रकमध्ये केले असून, व्यावसायिक अथवा खाजगी मालवाहतुकीसाठी भाडे आकारून ही महाकार्गोची सेवा दिली जात आहे. या सुरु केलेल्या सेवेमुळे लॉकडाऊन मध्ये सुद्धा गरजेच्या वस्तूंची ने-आण करणे शक्य झाले आहे. कोकणातील आंबा, काजू, नारळ कलमांची ने-आण करण्यासाठी लालपरीच्या कार्गो ट्रकचा वापर बागायतदार मोठ्या प्रमाणात करताना दिसत आहेत. लॉकडाऊन मुळे ठप्प झालेले व्यवहार निदान या मार्गामुळे तरी काही प्रमाणामध्ये सुरु राहिल्याने बागायतदारांना दिलासा मिळाला आहे, आणि लॉकडाऊन ठप्प झालेले राज्य परिवहन मंडळाला सुद्धा चांगल्या प्रकारे आर्थिक फायदा झाला आहे.
महाकार्गो ट्रकच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यातून दुसर्या कोणत्याही ठिकाणी घरपोच सेवा दिली जात असल्याने ही गोष्ट ग्रामीण भागातील बागयतदारांसाठी नक्कीच सोयीची ठरणार आहे. त्यामुळे लहान ते मोठ्या बागायतदारांना एस.टी महामंडळाच्या वतीने असे आवाहन करण्यात येत आहे कि, वाहतुकीसाठी अशा प्रकारची कोणतीही मदत लागणार असेल तर तालुक्यातील आगरप्रमुखांशी संपर्क करावा.