रत्नागिरीसह अनेक जिल्ह्यांमध्ये संकटकाळामध्ये मदतीसाठी ११२ हा आपत्कालीन नंबर देण्यात आला आहे. कित्येक वेळेला गरजेच्या वेळी उपयोगी पडणार कोणी मिळत नाही. आणि एखादे संकट उद्भवले तर मानसिक स्थिती भांबावलेली असते, त्यामुळे कुठूनतरी तात्काळ मदत मिळावी एवढाच एक विचार डोक्यामध्ये फिरत असतो. अडीअडचणीच्या वेळी पोलीस अथवा तत्सम आपत्कालीन मदत मिळावी यासाठी शासनाने ११२ नंबरची हेल्पलाईन सेवा सुरु केली आहे. ही सेवा अद्ययावत प्रणाली असून, मदतीसाठी फोन केलेल्या व्यक्तीचा पत्ता म्हणजेच तो ज्या जागी आत्ता संकटात आहे त्या स्थळाचे लोकेशन सुद्धा कळण्याची सुविधा या हेल्पलाईन वर उपलब्ध केलेली आहे.
कधी कोणावर कोणत्या प्रकारचे संकट येईल याची कल्पना कोणालाच नसते. कोणत्याही व्यक्तीला संकटकाळी वेळेवर मदत मिळणे गरजेचे असते. यासाठी शासनाने संपूर्ण राज्यासाठी केवळ एक असा हा हेल्पलाईन नंबर ११२ हा सुरु केला आहे. या नंबर वर पोलीस यंत्रणा आणि अग्निशामक यंत्रणा जोडली गेली असून, राज्यातून कुठूनही या नंबर वर फोन केला असता, कंट्रोल रूममध्ये त्यांची माहिती मिळून, आवश्यकतेनुसार योग्य त्या मदतीस धावत जाण्यासाठी पोलीस यंत्रणा तयार असल्याचे सांगण्यात आले आहे.
यापूर्वीही १०० क्रमांक आपत्कालीन सेवेसाठी सुरु करण्यात आला होता. परंतु, काही तांत्रिक अडचणीना कायमच सामोरे जावे लागत होते. काही वेळेला मदतीसाठी एका राज्यात लावलेला नंबर इतर दुसर्या राज्यातही जोडला जात असे. त्यामुळे आत्ता आप्तकालीन नंबर म्हणून ११२ नंबर सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणेने सुद्धा संकटकाळी ११२ क्रमांकाचा वापर करण्यास सुचविले आहे.