सोलापुरातील अक्कलकोट मधील ११ गावांचा कर्नाटकात सामील होण्याचा ठराव केला आहे. आणि हा ठराव जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द करण्यात आला आहे. मूलभूत सुविधा पुरवता येत नसतील तर कर्नाटकात जाण्याची परवानगी द्या अशा आशयाचा ठराव ११ गावाच्या गावकऱ्यांनी केला आहे. अक्कलकोट तालुक्यातील शेगाव, कोरसेगाव, कांडेवाडी खुर्द, देवी कवठे, कलकजारा, शावळ, शेगाव बुद्रुक, हेळी, आळगे, मगरुळ आणि धारसंग या गावच्या ग्रामपंचायतीनी हा ठराव केला आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोमई यांनी जत तालुक्यातील गावांवर दावा सांगितल्यानंतर पुन्हा एकदा कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद पुन्हा एकदा पेटला आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील काही गावांनी विकासाच्या मुद्यावर महाराष्ट्र सरकारला अल्टिमेटम देत कर्नाटकात सामील होण्याचा इशारा दिला आहे. मूलभूत सुविधा देत नसतील तर कर्नाटकात जाण्याची परवानगी द्या म्हणत सोलापूर जिल्ह्यामधील अक्कलकोट तालुक्यातील ११ गावांनी कर्नाटकात जाण्याबाबतचा ठराव जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द केला आहे.
दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील १८ गावं कर्नाटकात जाण्यास उत्सुक आहेत. याबाबत सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावाकऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. सोलापूर जिल्ह्यातील हत्तरसंग, कुडल, बोळकवठा, औराद, बरूर, चिंचपूर, टाकळी, कुरघोट, लवंगी, बाळगी, भंडारकवठे, तेलगाव, कोर्सगांव, मुंडेवाडी, कुमठे, केगांव बु., केगांव खुर्द, चिंचोली नजीक, सुलेरजवळगे, तडवळ, शेगाव, धारसंग, कल्लकजोळ इत्यादी गावं हे कर्नाटकात जाण्यास उत्सुक आहेत. त्यामुळे राज्यातील या काही गावांबद्दल निर्माण झालेल्या वादावरून पुन्हा एकदा प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.