गजबजलेल्या राजापूर शहर बाजारपेठेत विजेच्या पोलवर काम करत असताना विजेचा तीव्र धक्का लागून गंभीर जखमी झालेल्या संतोष रामचंद्र वरक (वय २८ रा. मयेकर मांगर, नाणार) येथील महावितरणच्या तांत्रिक कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान राजापूर ग्रामीण रूग्णालयात मृत्यू ओढवला. मंगळवारी सकाळी १०.३० ते ११.०० वाजण्याच्या दरम्यान ही दुदैवी घटना घडली. भर बाजारपेठेत घडलेल्या या अपघातात एका तरूण कर्मचाऱ्याचा दुदैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, या अपघाताचे वृत्त कळताच महावितरणच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसह शहरातील नागरिकांनी राजापूर ग्रामीण रूग्णालयात धाव घेतली.
मंगळवारी सकाळी शहर बाजारपेठेत संतोष वरक हा एका ग्राहकाच्या वीजमिटरचे काम करत होता. यावेळी वायर जोडताना अचानक हातातील वायरमध्ये जोरदार विजेचा करंट आल्याने विजेचा जोरदार धक्का बसून तो खाली कोसळला. यात तो गंभीररित्या जखमी झाला होता. त्याच्या डोक्यालाही गंभीर दुखापत झाली होती. त्याला अधिक उपचारार्थ – राजापूर ग्रामिण रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. बाजारपेठेत विजेचा धक्का लागून ‘तोखालीकोसळताच लगतच असलेल्या अनेक व्यापारी व नागरिकांनी धाव घेत त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र तो निष्फळ ठरला. एक कार्यतत्पर होतकरू तरूण वायरमेन म्हणून तो ओळखला जात असे.
कोणतेही काम असो तो तत्परतेने करत असे. त्यामुळे त्याचा मित्र परिवारही मोठा आहे. त्याच्या या अपघाती मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेनंतर महावितरणचे अधिक्षक अभियंता साळे, राजापूर उपिवभाग- १चे उपकार्यकारी अभियंता ओमकार डांगे, शाखा अभियंता सनी पवार यांनी रूग्णालयात धाव घेतली. आमदार राजन साळवी यांसह भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र नागरेकर तसेच सर्वच राजकिय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राजापूर ग्रामीण रूग्णालयात जाऊन वरक कुटुंबियांचे सांत्वन केले. या घटनेची माहिती मिळताच उपविभागिय पोलीस अधिकारी यशवंत केडगे, पोलीस निरीक्षक भरत धुमाळ यांनी तत्काळ घटनास्थळी व ग्रामीण रूग्णालयात जाऊन माहिती घेतली.
याप्रकरणी महावितरणचे कर्मचारी मनोज दत्ताराम पाटकर यांनी राजापूर पोलीसांत खबर दिली आहे. शहर बाजारपेठेत विजंमिटरचे काम करत असताना अचानक शॉक लागून संतोष वरक याचा मृत्यू झाल्याचे त्यांनी नमूद केले आहे. याप्रकरणी पोलीसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सुधीर उबाळे करत आहेत. अशाप्रकारे अपघाती मृत्यू झाल्याने वरक कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या घरातील एकुलता एक कमावता मुलगा हरपला आहे. त्यामुळे वरक कुटुंबियांना शासन-महावितरणने भरीव आर्थिक मदत द्यावी अशी मागणी होत आहे. मयत संतोष याच्या पश्चात पत्नी, एक तीन वर्षाचा मुलगा, आईवडील असा परिवार आहे.