रत्नागिरीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे या सोमवार दि. २९ डिसेंबर रोजी सकाळी ११ वा. आपला पदभार स्वीकारणार आहेत. यावेळी पालकमंत्री ना. उदय सामंत हे उपस्थित राहाणार आहेत. दरम्यानं पदभार स्वीकारण्या आधीच त्यांनी जनसेवेचा श्रीगणेशा केला आहे. रत्नागिरीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा शिल्पाताई सुर्वे यांनी आपल्या कामाचा धडाका निवडून आल्यापासूनच सुरू केला आहे. निवडणूक संपली असून आता केवळ विकासाचे राजकारण करायचे आहे, पदभार स्वीकारण्याची औपचारिकता पूर्ण होईलच, पण रत्नागिरीकरांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. शहराची पाणी समस्या कायमस्वरूपी सोडवणे हे माझे पहिले उद्दिष्ट असेल, असा शब्द त्यांनी यावेळी दिला.
नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी सहसा पदभार स्वीकारल्यानंतर काम ाला सुरुवात करतात, मात्र शिल्पाताई सुर्वे यांनी विजयानंतर लगेचच सक्रिय होत रत्नागिरीच्या समस्या जाणून घेण्यास सुरुवात केली आहे. पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी जलसाठे, धरणे यांची त्यांनी पाहाणी केली. तसेच कचरा डेपोलाही भेट दिली. यावेळी नगरसेवक सौरभ मलुस्टे, पप्पू शेठ सुर्वे, नगरसेविका पूजा पवार, दीपक पवार हे उपस्थित होते.

