रत्नागिरीमध्ये कोरोनाचा प्रभाव जास्त जाणवत असल्याने २ महिन्यांपासून अक्षरशः बंद असलेली रत्नागिरी काही प्रमाणात निर्बंधात उघडली जाणार आहे. कोरोनामुळे गेली दीड वर्षापासून सर्वजण एकतर वर्क फ्रॉम होम तरी करत आहे नाही तर अनेक जण नोकरी गमावल्यामुळे बेरोजगार तरी झाले आहेत. कोरोनामुळे करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे अनेकांचे उद्योग धंदे, लहान मोठे व्यवसाय सर्वच बंद पडले आहे. त्यामुळे अनेकजण आर्थिक विवंचनेमध्ये आहेत.
रत्नागिरीतील मिनी रत्नागिरी ओळखल्या जाणाऱ्या कुवारबाव गावामध्ये ग्रामपंचायतीने दिलेल्या पाण्याचा बिलाचा आकडा पाहून कुवारबाववासियांना धक्का बसला आहे. कुवारबाव ग्रामपंचायतीने पाणीपट्टीमध्ये २०० ते ३००% वाढ केल्याने तशी बीले काढल्याने कुवारबावचे नागरिक अवाक् झाले आहेत. ज्या ग्राहकांना याआधी ४०० रुपये पाण्याचे बिल येत होते, त्यांना आत्ता नवीन आलेल्या बिलाप्रमाणे ११०० रुपयाच्या दरम्यान पाणी बील मिळाले आहे. म्हणजे प्रत्येक युनिटमागे ४० रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
या प्रकरणामध्ये पाणीवाढ करण्याअगोदर ग्रामसभा आणि पाणी कमिटीला विचारात न घेण्यात आल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. या अचानक झालेल्या पाणीपट्टी वाढी विरोधात भाजपचे सतेज नलावडे यांनी जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्याकडे निवेदन दिले आहे. तसेच एवढी केलेली पाणीपट्टी वाढ नागरिकांना परवडणारी नसल्याने, या विरोधामध्ये सर्व कुवारबाववासीय एकवटले असल्याचे सतेज नलावडे यांनी सांगितले. कुवारबाव मधील गौरव पावसकर, प्राजक्ता चाळके, गणेश मांडवकर, अनुश्री आपटे या सदस्यांनी वाढीव पाणीपट्टीबाबत लेखी तक्रार दिली आहे. भाजप या पाणीपट्टी विरोधात लवकरच उपोषणाला बसणार असल्याचा इशारा त्यानी ग्रामपंचायतीला दिला आहे.