रत्नागिरीमध्ये अनेक अव्वल दर्जाच्या शिक्षण संस्था असून, प्रत्येक शिक्षण संस्थेची काही न काही खासियत असते. विविध संस्था विविध उपक्रमांमध्ये अग्रेसर असल्याने त्यांना अनेक पुरस्कार मिळत असतात. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजामध्ये असलेल्या न्यू एज्युकेशन सोसायटी संचालित कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाला भारत सरकारकडून मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण शिक्षा परिषदेतर्फे एक जिल्हा-एक चॅम्पियन या राष्ट्रीय स्वच्छता कृती योजना या क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल पुरस्कार जाहीर झाला आहे.
केंद्र सरकारच्या २०२०-२१ सालासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण शिक्षा परिषदेतर्फे गेल्या वर्षीपासून राष्ट्रीय स्तरावर प्रत्येक राज्यातील एका जिल्ह्यातील एका महाविद्यालयाला या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. २०२०-२१ च्या पुरस्कारासाठी भारतातील एकूण ४०० महाविद्यालय आणि संस्थान हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यामधील एकमेव लांजा महाविद्यालयाला हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यामुळे अनेक स्तरातून महाविद्यालयावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे.
लांजा महाविद्यालयामध्ये अनेक शैक्षणिक उपक्रम, विविध स्पर्धा, शिक्षणासोबत अनेक खेळ, भविष्यात विद्यार्थ्यांना व्यवसाय उपयोगी उपकम राबविले जातात. गेले वर्षभर राबविण्यात येणाऱ्या स्वच्छता अभियानाला यावर्षीचा पुरस्कार मिळाला आहे. या विविध उपक्रमामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कुलकर्णी, उपप्राचार्य डॉ.चव्हाण, न्यू एज्युकेशन सोसायटी लांजाचे कार्याध्यक्ष जयवंत शेट्ये, उपकार्याध्यक्ष कुरूप, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग, प्राध्यापकेतर कर्मचारी, इतर कार्यालयीन कर्मचारी, विद्यार्थी, पालक यांचा सदैव सक्रीय सहभाग लाभतो. त्यामुळे मिळालेल्या पुरस्कारासाठी सर्व लांजा महाविद्यालयातील सर्व सदस्यांचे अनमोल सहकार्य लाभले आहे.