रत्नागिरी जिल्हा जरी चौथ्या टप्प्यात अनलॉक झाला असला तरी, काही दुकानांवरील निर्बंध अजून हटवण्यात आलेले नाहीत. त्यामध्ये कपडे, ज्वेलर आणि मोबाईल दुकानांचा देखील समावेश आहे, सध्या सर्वच गोष्टी ऑन लाईन सुरु असल्याने, मोबाईल दुकाने उघडण्याची मागणी जोर धरत आहे. तात्काळ मोबाईलची दुकाने उघडण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने द्यावे, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांनी केली आहे.
कोरोना महामारीमुळे प्रत्यक्ष शाळा बंद असल्या तरी, ऑनलाइन शिक्षण पद्धती सुरु असल्याने विद्यार्थ्यांना चांगल्या इंटरनेट आणि मोबाईलची गरज आहे, सध्या रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व मोबाइल दुकाने बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना अद्ययावत मोबाईल उपलब्ध होत नाही. तसेच अनेकांची मोबाईल दुरुस्ती सुद्धा करता येत नसल्याने अनेक अडचणी निर्माण होत आहेत. बाजारपेठ मधील बरीचशी दुकाने उघडी आहेत. मात्र रत्नागिरीतील मोबाईलची दुकान मात्र अद्याप उघडलेली नाहीत, त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
पावसामुळे नेटवर्कचा मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत असल्याने, आणि ग्रामीण भागात तर हि मोठ्या प्रमाणात समस्या येत आहे. अनेकांचे मोबाइल बंद पडणे, दुरुस्त करून घेणे, स्पेअर पार्ट बदलणे अशा अनेक तांत्रिक गोष्टी मोबाईल दुकाने बंद असल्याने अशक्य होत आहे. याबाबत अनेक पालकांनी, आणि विद्यार्थ्यांनी युवा मोर्चाशी संपर्क साधला असल्याचे अनिकेत पटवर्धन यांनी सांगितले.मोबाइल दुकान चालकांनी बंदी असताना दुकान उघडल्यास त्यांना दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला जातो. मात्र एवढा दंड भरणे शक्य नसल्याने, मोबाईल विक्रेत्यांनी दुकाने बंद ठेवली आहेत. बऱ्याच पालकांना विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शाळेमुळे घरीच थांबावे लागते, अनेकांना त्यामुळे नोकरीवर पाणी सोडावे लागले आहे.
दुकाने बंद असतानाही या कालावधीत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रुग्णसंख्या वाढतच होती. आता दुकाने उघडल्यानंतर कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झालेली नाही. त्यामुळे मोबाईलचे दुकान उघडल्यास कोरोना वाढेल की काय अशी भीती जिल्हा प्रशासनाला वाटते का? असा सवाल करून त्वरित मोबाईलची दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी अनिकेत पटवर्धन यांनी केली आहे.