राज्यात मोठ्या कालावधीच्या विश्रांती नंतर पुन्हा एकदा गेल्या दोन दिवसापासून मान्सून चांगलाच सक्रीय झाला असून शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. तर मासेमारी व्यवसाय देखील १ तारखेपासून पुन्हा सुरु झाल्याने आणि थांबलेल्या पावसाला सुरुवात झाल्याने मासे मिळणे कठीण बनल्याने मच्छीमार नाराज झाले आहेत. तसेच पावसामुळे नौका सुद्धा मच्छीमारीसाठी समुद्रात घालणे कठीण बनले आहे.
शनिवार दि.६ पुणे जिल्ह्यातील घाट परिसर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, तसेच उत्तर महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा आणि उत्तर व पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये यल्लो अलर्ट देण्यात आला आहे.
मान्सून सक्रिय झाल्याने राज्यात पावसाचा जोर वाढतच चालला आहे. कोकण घाटमाथ्यावर पावसाच्या जोरदार सरी पडायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शनिवारी दक्षिण कोकण व घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही ठिकाणी ढगफुटीसारखा पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला.
राज्यात शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली. दरम्यान, पुढील चार ते पाच दिवस राज्यात पावसाचा जोर असाच कायम राहणार आहे. सध्या मान्सूनचा कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे सरकला असून त्यात गोवा, कर्नाटक आणि परिसरावर त्याचबरोबर राजस्थानमध्ये चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. या सर्व परिस्थितीमुळे पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले असून पावसाचा जोर वाढतच राहणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.