कोकण विभागामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात पाउस पडत असल्याने, अनेक ठिकाणी झाडांची पडझड होत आहे. अनेक वेळा त्यामुळे विजेच्या तारा आणि खांब देखील तुटून पडत आहेत. त्यामुळे कोणाच्याही जीविताला धोका पोहचू नये यासाठी महावितरण कंपनीने विशेष आवाहन केले आहे.
वादळ, वारा व पावसामुळे वीजतारांवर झाड वा झाडांची फांदी तुटून पडणे, वीजतारा तुटणे, वीजखांब वाकणे वा पडणे, डीपी वाकणे किंवा पडणे, असे प्रकार पावसाळ्यामध्ये अधिक प्रमाणात घडतात. त्यामुळे पावसात विजेच्या तारांखाली, वीजखांब, रोहित्राजवळ थांबू नये. कोणत्याही उपकरणांना स्पर्श करणे धोकादायक ठरू शकते. तेव्हा नागरिकांनी विद्युत यंत्रणेपासून सावधान राहावे. ताबडतोब त्याबाबत महावितरणच्या नजीकच्या कार्यालयास त्वरित सूचना द्यावी, असे आवाहन महावितरण कंपनीने केले आहे.
जोरदार पाऊस सुरु असतांना शक्यतो विजेचा पंप चालू अथवा बंद करणे टाळावे. जनावरे, गुरे-ढोरे विजेच्या खांबास, ताणास तसेच विजेच्या खांबाजवळ किंवा तारेखाली असलेल्या झाडाला बांधू नये. पाणी हे वीज सुवाहक आहे. आपल्या घरातील विजेचे बोर्ड, विजेची उपकरणे पावसाच्या पाण्याशी किंवा भिंतीवरील ओलाव्याशी संपर्कात येणार नाहीत याची विशेष काळजी घ्या. विद्युत उपकरणे हाताळतांना पायात रबरी चप्पल किंवा बूट घालावेत त्यामुळे विजेचा झटका बसणार नाही. एखाद्यास विजेचा धक्का बसल्यास त्या व्यक्तीला स्पर्श न करता त्यास कोरड्या लाकडाने बाजूला करावे, त्वरित कृत्रिम श्वास देत रुग्णालयात दाखल करावे.
विजेची उपकरणे ओल्या हातांनी चालू वा बंद करू नये. बांधकाम करताना शेजारून गेलेल्या विद्युत तारेपासून सुरक्षित अंतर राखावे. बांधकामाची सळई हाताळताना ती विद्युत तारेला स्पर्श होण्याचा धोका असतो. हे आपण सावधानता बाळगून टाळू शकतो. त्या दृष्टीनेच प्रतिबंधात्मक उपाय म्हणून विद्युत मांडणीची आर्थिंग सुस्थितीत ठेवावी, ती वेळोवळी तपासून घ्यावी, असे आवाहन महावितरणने केले आहे