रत्नागिरी पालिकेतील शिवसेना भाजपाच्या सत्ताधाऱ्यांनी अवघ्या तिसऱ्या महिन्यातच रत्नागिरीकरांवर कराचा बोजा टाकला आहे. सोमवारी झालेल्या विशेष सभेमध्ये अग्निशमन सेवा कर आणि दिवाबत्ती कर प्रत्येकी २ टक्के लागू केला आहे. स्वच्छता कराचा आणखी बोजा नको म्हणून या २ टक्के वाढणाऱ्या सेवा करातून सुट मिळाली आहे. तरी एकुण ४ टक्के कर यावर्षीपासून लागू झाला आहे. नगर पालिकेच्या उत्पन्न वाढीच्यादृष्टीने हे दोन कर लागू करण्यात आले असल्याचे सत्तारूढ पक्षाच्यावतीने सांगण्यात आले. रत्नागिरी नगर पालिकेची विशेष सभा सोमवारी सकाळी ११ वाजता नगराध्यक्षा सौ. शिल्पा सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाली. पालिकेची आर्थिक परिस्थिती अतिशय नाजूक आहे. त्यामुळे ती सुधारावी, उत्पन्नाचे स्रोत वाढावे यासाठी काही निर्णय घ्यावे लागणार आहेत. त्यानुसार आजच्या विषय पुत्रिकेवर येणाऱ्या विषयांना चर्चा करून मंजूरी द्यायची आहे, अशी प्रस्तावना नगराध्यक्षा सौ. शिल्पा सुर्वे यांनी केली.
त्यानुसार सभागृहाच्या कामकाजाला सुरवात झाली. विषय पुत्रिकेवरील विषय क्र. १६ चे वाचन करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ च्या कलम १०५ (२) नुसार अग्निशमन सेवा कर लागू करण्याबाबत चर्चा करण्यात आली. अग्निशमन दल अधिक मजबूत करण्याच्यादृष्टीने २ टक्के अग्निशमन सेवा कर लागू केल्यास वर्षाला सुमारे २५ लाख रुपये पालिकेच्या तिजोरीत पडणार आहेत. सुमारे ३० हजार ६१९ मालमत्ताधारकांकडून हा कर वसूल केला जाणार आहे. याला सभागृहाने मंजूरी दिली.
दिवाबत्ती कर – त्यानतंर दिवाबत्ती सेवेवर पुन्हा २. टक्के कर बसविण्याबाबत विषय सभागृहापुढे ठेवण्यात आला. यालाही सभागृहाने मंजूरी दिली. त्यानंतर तिसरा स्वच्छ्ता कर लागू करण्याबाबत सभागृहापुढे चर्चा सुरू झाली. यावेळी मात्र सभागृहातील शिवसेनेचे नगरसेवक सुहेल मुकादम, उपनगराध्यक्ष समिर तिवरेकर आणि उबाठाचे नगरसेवक अमित विलणकर यांनी हा विषय उचलून धरला. आपली सत्ता येऊन अवघे ३ महिने झाले. नागरिकांनी मोठ्या विश्वासाने आपल्याला निवडुन दिलले आहे. शहराचा विकास व्हावा, मुलभुत सुविधा अधिक मिळाव्यात यासाठी सभागृहात पाठवले. परंतु आपण त्यांच्यावर एक नाही तरी ३. कर लादणार आहोत, हे योग्य नाही अशी भूमिका या नगरसेवकांनी मांडली.
मुख्याधिकाऱ्यांचा खुलासा – यावर मुख्याधिकारी वैभव गारवे, म्हणाले, १९९२ पासून हे कर लागू करण्याबाबत तरतूद आहे. परंतु आपण त्याच्यावर कधी निर्णय घेताला नाही. आता आपण पालिकेची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी हे निर्णय घेण्याची गरज आहे. आपण कर लादला तर नागरिकांवरच हा पैसा खर्च होणार आहे. आजपर्यंत आपण पालिकेच्या फंडातून हे कर भरत होतो. याला नगरसेवक अमित विलणकर आणि समिर तिवरेकर म्हणाले, प्रशासकीय कारभार ४ वर्षे सुरू होता. तेव्हा हे कर का लागू केले नाही? आता आम्ही आल्यावर हे कर लागू केले तर नागरिकांमध्ये वेगळा आणि चुकीची संदेश जाईल. नगरसेवकांचा विरोध लक्षात घेता. स्वच्छता कर स्थगित ठेवण्यात आला. परंतु उर्वरित अग्निशमन सेवा कर आणि दिवाबत्ती सेवा कर हे दोन कर लागू करण्याचा निर्णय सभागृहाने घेतला.
म्हणून स्थगित केला स्वच्छता कर – रत्नागिरीकरांवर जादा दोन कर लागू करण्याचा निर्णय सभागृहाने घेतला. तिसरा कर लागू केला तर वेगळा संदेश जाईल. अनेक नागरिकांना वर्षिक घरपट्टी किंवा पाणीपट्टी दोनशे ते शंभर रुपये येते. तिच भरताना त्यांना नाकी नऊ येत. त्यात प्रत्येक घरावर महिन्याला ३० रुपये या प्रमाणे स्वच्छता कर लागू केला तर ३६० रुपये वाढीव कर भरणे शक्य होणार नाही. याबाबत सभागृहाचे एकमत झाल्यामुळे स्वच्छता कर स्थगित ठेवण्यात आला.

