साखरप्यावरून रत्नागिरीकडे लग्नासाठी जाणाऱ्या कारची समोरुन येणाऱ्या मालवाहू ट्रकला धडक बसून झालेल्या अपघातात वृद्धा जागीच ठार झाली असून, ५ जण जखमी झाले आहेत. रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर नाणीज जवळील इरमलवाडी येथे शुक्रवारी दुपारच्या सुमारास हा अपघात घडला. सुवर्णा शिवराम नागवेकर वय-७०, रा. वाडावेसवरांड, फणसवणे भंडारवाडी) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर हरिश्चंद्र वारंग (वय-६५), हर्षदा हरिश्चंद्र वारंग (वय ६०), विक्रांत हरिश्चंद्र वारंग (३०), सुनील पेडणेकर (वय ५५), सुषमा सुनील पेडणेकर (वय ५०, सर्व रा. खारघर, मुंबई) अशी जखमींची नावे आहेत.
ट्रकचालक मंजुनाथ शिद्राय पाटील वय ३८, रा. उंब्रज ता. इंडी, जि. विजापूर हा जयगडहून ट्रक (एमएच ०९, सीए ३१२४) घेऊन सोलापूरला निघाला होता. दरम्यान, नाणीज येथील इरमलवाडी वाडी येथील वळणावर या समोरून येणाऱ्या कारने (एमएच ०१, डीपी २६५८) ट्रकला जोरदार धडक दिली. धडक एवढी मोठ्याने होती कि, त्यात ही कार रस्त्याच्या कडेला खाली फेकली गेली आहे. या कारमध्ये सहा जण प्रवास करत होते. सर्व जण साखरप्यावरून रत्नागिरीकडे लग्नकार्यासाठी चालले होते.
या अपघाताची माहिती नाणीज येथे समजताच तरुणांनी त्वरित घटनास्थळी दाखल होत मदतकार्य सुरू केले. याच वेळी जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाची रुग्णवाहिका अपघातस्थळी दाखल झाली. त्यातून मृत व जखमींना रत्नागिरी जिल्हा रुग्णालय दाखल केले. अधिक तपास पाली पोलिस स्थानकाचे हवालदार मोहन कांबळे आणि त्यांचे सहकारी करीत आहेत. लग्न कार्यासाठी चाललेल्या वेळी अशा प्रकारे घडलेल्या घटनेमुळे वातावरणच बदलून गेले.