रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून, १४ जून पर्यंत या दोन जिल्ह्यांमध्ये आँरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. जवळपास २०० मिमी पेक्षा अधिक आणि वेगवान पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे काही किनारपट्टी लगतच्या ठिकाणी पुर सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते, त्याचबरोबर घाटमाथ्यावर अति पावसामुळे दरडी कोसळण्याच्या घटना देखील घडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे पूर्वनियोजित एडीआरएफची टीम रत्नागिरीमध्ये नागरिकांच्या संरक्षणाखातर दाखल झाली आहे.
रत्नागिरीसह चिपळूण,खेड आणि राजापूर या ठिकाणी एडीआरएफच्या चार टिम दाखल झाल्या आहेत. ज्या ठिकाणी पुरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे, अशा ठिकाणच्या नदी आणि पुलांची पाहणी एनडीआरएफ कडून केली जाते आहे. या चार टीमचं नेतृत्व डेप्युटी कंमांडन्ट राकेश मिश्रा करत आहेत, तर रत्नागिरी टीमचं नेतृत्व इन्सपेक्टर शिवप्रसाद राव यांच्याकडे सोपवले गेले आहे. रत्नागिरीतील पुरजन्य भागात या टिमने आज पाहणी केली. तसेच ज्या भागात दरड कोसळण्याच्या संभावना आहेत, त्या ठिकाणची पाहणी देखील एनडीआरएफच्या टीमने केली आहे. रत्नागिरी तालुक्यातील काजळी नदी प्रत्येक पावसामध्ये धोक्याची पातळी ओलांडते, त्याच्या शेजारील टेंभ्ये गावातील लोकांशी संवाद साधून नदीजवळील घरांना नैसर्गिक आपत्ती उद्भवली तर आधीच स्थलांतराच्या नोटीसा देण्यात आल्या आहेत. चिपळूण मधील वाशिष्टी नदीची सुद्धा पाहणी तेथील एडीआरएफ टीमने केली आहे. रत्नागिरीत अति प्रमाणात पडणाऱ्या पावसामुळे जर कोणती नैसर्गिक आपत्ती निर्माण झाली तर त्यासाठी एनडीआरएफची टीम पुर्णपणे सज्ज झाली आहे