रत्नागिरी ते संगमेश्वर दीड तासाचे अंतर पार करण्यासाठी महामर्गावर पडलेल्या खड्ड्यामुळे दोन ते अडीच तास लागत आहेत. वाहनचालकांना प्रचंड त्रासदायक बनत आहे. खड्डे आणि रस्ते शोधताना बऱ्याच प्रमाणात अपघात होत आहेत.
मंत्री संत्री आले कि, रस्त्यांची डागडुजी केली जाते, परंतु, सर्वसामान्य जनते बद्दल कोणालाच काही पडलेलं नाही आहे. अनेक महिन्यांपासून मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डयांबाबत अनेक समाजसेवी संघटना आंदोलन करत आहेत, अनेक निवेदने दिली गेली, खड्ड्यामध्ये वृक्षारोपण करण्यात आले, तरीही महामार्गाच्या खड्ड्यांकडे कोणाचेच लक्ष नाही. त्यामध्ये भर म्हणून बावनदी-निवळी वळणावर गेल्या चार दिवसामध्ये ८-१० अवजड लोडेड ट्रक, कंटेनर बिघाडल्यामुळे अडकून होते.
सध्या निवळी येथे फ्लायओव्हरचे काम सुरु असल्याने दोन्ही बाजूने वाहतुकीला मार्ग काढण्यात आला आहे. या ठिकाणी भला मोठा खड्डा पडला असून, त्यात ढोपरभर चिखल-माती साचल्याने दुचाकी त्यात रुतून बसत आहेत. अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने त्या ठिकाणी भला मोठा खड्डा पडला असून, खड्ड्यामध्ये रस्ता कुठे हरवला आहे हे शोधावे लागत आहे.
त्यामध्ये सतत पडणाऱ्या पावसामुळे या खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने वाहन खड्ड्यात जोरदार आपटून वाहनचालकांना शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. महामार्ग चौपदरीकरण गेले खड्ड्यात आधी आहे तोच मार्ग चांगला करा असा संतप्तपणे खेद वाहन चालक व्यक्त करत आहेत. राजकारणी आणि लोक प्रतिनिधी फक्त एकमेकांची उणीदुणी काढण्यात व्यग्र असल्याने. सर्वसामान्यांना सहन करणाऱ्या त्रासाबद्दल त्यांना काहीही देणे घेणे नाही आहे.