27.6 C
Ratnagiri
Saturday, July 27, 2024

वादळी वाऱ्याने गुहागरमध्ये मोठे नुकसान…

वादळी वाऱ्यासंह कोसळणाऱ्या पावसाने संपूर्ण गुहागर तालुक्याला...

आरजू टेस्कोल फसवणूक, संचालकांविरुद्ध दोषारोपपत्र

आरजू टेस्कोल कंपनीविरोधात गुंतवणकूदारांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात...

रत्नागिरी शहराचे वाटोळे करणाऱ्यांना घरी बसवा – बाळ माने

रत्नागिरी शहराच्या विकासाचा रोडमॅप भाजपकडे तयार आहे....
HomeKokanआंबेत पुलाच्या दुरुस्तीला अडथळे

आंबेत पुलाच्या दुरुस्तीला अडथळे

बहूचर्चित आणि महत्वाच्या असणाऱ्या आंबेत पुलाच्या दुरुस्ती कामाला येणाऱ्या विविध तांत्रिक आणि नैसर्गिक अडचणीमुळे वेळ लागत असल्याची माहिती महाड येथील उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभागाने कळवली आहे. सामाजिक कार्यकर्ता व रत्नागिरी काँग्रेस कमिटी सचिव जमीर माखजनकर यांना याबाबत बांधकाम विभागाने लेखी पत्र पाठवले आहे. सावित्री खाडीवरील या पुलाचे काम टी. अँड टी. पुणे यांच्यामार्फत सुरू आहे. हे काम जून २०२३ पर्यंत पूर्ण करायचे नियोजन होते; मात्र पुलाच्या दुरुस्तीसाठी आवश्यक असणारी बार्ज २४ मी. उंचीची उपलब्ध न झाल्याने बार्जच्या पायाची उंची वाढवण्यासाठी ठेकेदाराला सुरवातीला बराच कालावधी लागला. तसेच कामाच्या ठिकाणी मगरींचे वास्तव्य आढळून आल्याने डायव्हर्स काम करण्यास तयार नव्हते. त्यामुळे बाहेरून डायव्हर्स आणून काम सुरू करण्यास वेळ लागला.

सावित्री खाडीत पायलिंग करताना अतिशय कठीण खडक लागल्याने पायलिंगच्या कामास वेळ गेला. अनेकदा हॅमर पाईलमध्ये तुटल्याने ते हॅमर पाईलमधून काढण्यास बराचसा कालावधी गेल्याचे म्हटले आहे. पुलाच्या पायाची दुरुस्ती ही २० मीटर खोल पाण्यात व समुद्राच्या भरती-ओहोटीमध्ये पाण्याचा तीव्र वेग असल्याने मजूर काम करण्यास घाबरतात. या सर्व बाबींचा विचार करून पुलाचे काम पूर्ण करण्यास ३१ ऑगस्टपर्यंतचे नियोजन असल्याचे कळवण्यात आले आहे. या कालावधीत पर्जन्यमानाचा विचार करता हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. तसेच नैसर्गिक आपत्ती पूर, वादळ हवामान बदलांमुळे हा कालावधी वाढण्याची शक्यता- वर्तवण्यात आली आहे. या सर्व बाबींचा विचार करून आंदोलन करू नये, असे पत्र माखजनकर यांना देण्यात आले आहे.

वारंवार बदलते तारीख – डिसेंबर २०२२ मध्ये झालेल्या बैठकीत बांधकाम उपविभाग महाड कार्यकारी अभियंता यांनी मार्च २०२३ मध्ये कोणत्याही परिस्थितीत पुलाचे काम पूर्ण करून वाहतूक चालू करण्यासंदर्भात आश्वस्त केले होते. त्यानंतर पाऊस सुरू होण्यापूर्वी जूनमध्ये पूल चालू करण्यात येईल, असे सांगण्यात आले. यानंतर १५ जुलैला सुरू होईल, अशी माहिती माणगाव बांधकाम विभागाचे शाखा अभियंता उलागडे यांनी माध्यमांना दिली होती. २० जूनला आमदार योगेश कदम यांनी प्रत्यक्ष या पुलाची पाहणी करून हा पूल सप्टेंबरमध्ये सुरू करण्याचे नियोजन असल्याची माहिती माध्यमांना दिली.

यंदाही गणेशभक्तांचे होणार हाल – या पुलाची दुरुस्ती रखडल्याने तो चालू होण्यास विलंब होत असल्याने या वर्षीही गणेशभक्तांचे हाल होणार असून, महाडचा वाढीव प्रवास करून मंडणगड, दापोलीत यावे लागणार असल्याची चिन्हे दिसून येत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular