नगराध्यक्ष बंड्या साळवी यांच्या अध्यक्षतेखाली रत्नागिरी नगर परिषदेतील विद्यमान नगरसेवकांची अंतिम सर्वसाधारण सभा गुरूवारी पार पडली. या बैठकीत पाणी योजनेच्या अपूर्ण कामावरून नगरसेवकांनी सभागृहात प्रश्नांची सरबत्ती केली. याआधी सुद्धा सर्वसाधरण बैठकीमध्ये पाण्याच्या समस्यांसंबंधी प्रश्न चांगलाच गाजला होता.
भाजप गटनेते समीर तिवरेकर यांनी भर सभागृहामध्ये रत्नागिरी पालिकेतील पाणी विभागाचे कर्मचारी रात्रभर मद्यपान करून टाईट अवस्थेत असतात, ना त्यांना लाईनची चावी सोडणे, ना पाण्याच्या टाकीची पातळी किती झाली हे पाहण्याची शुद्ध असते. त्यामुळे शहरी भागामध्ये पाणी वितरणाची वानवा झालेली आहे. सत्ताधार्यांचे याकडे अजिबात लक्ष नाही, असा आरोप त्यांनी केला आहे.
नगराध्यक्ष प्रदीप साळवी यांनी या विषयाची गंभीरता लक्षात घेऊन, वारंवार येणाऱ्या पाणी विभागाच्या तक्रारींवरून अधिकार्यांना धारेवर धरत मद्यपान करून कामावर येणार्या कर्मचार्यांना घरीच बसवा, असे आदेश दिले. आणि अशा कर्मचार्यांना ठेकेदार जर पाठीशी घालत असेल तर त्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाका, असे आदेश दिले आहेत.
त्याचप्रमाणे अनेक भागांमध्ये पाण्याच्या पाईप लाईन टाकण्यासाठी मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले आहे. अनेक भागात पाण्याची पाईप लाईन टाकून झाली आहे. केवळ चाचणी करून जोडण्या देणे शिल्लक आहे. मात्र जोडण्या वेळीच न दिल्याने, त्या जागच्या काढून टाकलेल्या पाईपलाईनमधून पाणी रस्त्यावर ओसंडून वाहत आहे. काही वेळा खड्डे आणि पाणी याचा अंदाज न आल्याने अपघात घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे तसेच दुचाकी घसरून अपघात होण्याची शक्यता असल्याचा मुद्दा नगरसेवक मुन्ना चवंडे यांनी मांडला. यानंतर नगराध्यक्षांनी संबंधिताना त्याबाबत विचारणा करून, त्यानुसार योग्य ते आदेश दिले आहेत.