नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा २६ रोजी आयोजित केली होती. मात्र, ही सभा पुढे ढकलली आहे. त्या सभेत विविध विभागांतील कर व शुल्क दरांमध्ये मोठी वाढ करण्याचा विषय ठेवला आहे. अनेक ठिकाणी ही वाढ दुपटीपेक्षा अधिक असून, त्या बदल्यात नगरपंचायतीकडून नागरिकांना कोणतीही सुविधा दिली जात नाही, असा आरोप माजी नगराध्यक्षा ममता मोरे यांनी केला. प्रस्तावित दरवाढीत जन्म-मृत्यू दाखला शुल्क ३० वरून १०० रुपये, जुना दाखला १०० वरून २०० रुपये, लोकसंख्या दाखला १०० वरून ५०० रुपये, स्मशानभूमी लाकडे (शहरातील नागरिकांसाठी) १५०० वरून २५०० रुपये, मालमत्ता कर विभाग घर उतारा शुल्क २० वरून १०० रुपये, चटई क्षेत्र दाखला ५० वरून १५० रुपये, थकबाकी नसल्याचा दाखला ५० वरून १५० रुपये, बाजार कर ५० वरून १०० रुपये, मच्छी मार्केट कर १५ वरून ५० रुपये.
स्वच्छता विभागाकडील घनकचरा कर १५० वरून ५०० रुपये प्रतिवर्ष, नगररचना विभागाकडील झोन दाखला ३०० वरून १००० रुपये, भागशः नकाशा शुल्क ३०० वरून १००० रुपये, विज मिटर ना हरकत ६०० वरून १५०० रुपये, वृक्ष परतावा ५००० वरून १०००० रुपये, पाणीपट्टी १२०० वरून ४००० रुपये प्रतिवर्ष अशी दरवाढ प्रस्तावित करण्यात येणार आहे. नगरपंचायतीचे उत्पन्न वाढविण्यासाठी ही दरवाढ प्रस्तावित केल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, या निर्णयाला ठाकरे शिवसेनेचा विरोध आहे, असे ममता मोरे यांनी सांगितले.

