रत्नागिरी शहरी भागामध्ये शीळ, पानवल धरण आणि नाचणे येथील काही खाणीतील पाण्याचा पुरवठा केला जातो. परंतु, अचानक काल शहराला नैसर्गिक उताराद्वारे पाणीपुरवठा करणारी पानवलची जलवाहिनी पोमेंडी खुर्द काजरघाटी येथे फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. आणि मुख्य म्हणजे वस्तीपासून लांब ही घटना घडल्याने पालिका कर्मचाऱ्यांना देखील याबाबत माहिती नव्हती. ही माहिती मिळाल्यानंतर संपूर्ण पाणीपुरवठा बंद ठेवत दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले. आणि शहरामध्ये आज पाणी पुरवठा होणार नसल्याची माहिती देण्यात संध्याकळी देण्यात आली.
पावसानंतर सुमारे दोन महिने शहराला जास्तीत जास्त पानवल धरणातून पाणी पुरवठा केला जातो. नैसर्गिक उताराने शहराला पाणी पुरवठा होतो. सुधारित पाणी पुरवठा योजनेमध्ये ही संपूर्ण जलवाहिनी बदलण्यात आली आहे; परंतु धरणाची स्थिती अतिशय खराब आहे. त्यामुळे धरणामध्ये गाळ साचल्याने आणि गळती मोठ्या प्रमाणात असल्याने पाणीसाठा कमी होतो; मात्र दीड-दोन महिने पाणी पुरवठा होत असल्याने शीळ धरणावरील ताण कमी होतो. जर हा गाळ उपसा केला तर अधिक प्रमाणात पाण्याचा साठा होऊन पाण्याचे नियोजन योग्य प्रकारे होईल.
गेल्या चार ते पाच दिवसांपासून पोमेंडी खुर्द येथील श्री. भडकमकर यांच्या घराच्या मागे पानवलची ही पाईपलाईन फुटली आहे. यातून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. काही ग्रामस्थांना निदर्शनास आल्यानंतर त्यांनी पालिकेला याची माहिती दिली. पालिकेने आज दुपारी पाणी पुरवठा बंद केला. शुक्रवारी दि. २३ रोजी सकाळी तिची दुरुस्ती करून पुन्हा पाणी पुरवठा सुरळीत केला जाणार आहे.