रत्नागिरी शहराच्या स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहराला नैसर्गिक उताराने पाणीपुरवठा करणाऱ्या पानवल धरणाच्या दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. यासाठी २० कोटींहून अधिकचा निधी एमआयडीसीने दिला असून, पाटबंधारे विभागाकडून यावर लक्ष ठेवले जाणार आहे. या दुरुस्तीमुळे ०.३४१ दलघमी इतका पाणीसाठा होणार आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते लवकरच या कामाचा आरंभ करण्यात येणार आहे. पानवल धरणाच्या ६० वर्षांनंतर दुरुस्तीला सुरुवात झाली. सद्यःस्थितीत या धरणाला ५० टक्क्यांच्या वर गळती आहे. धरण धोकादायक बनल्याने त्याची दुरुस्ती आवश्यक होती. या धरणाच्या मजबुतीसाठी २० कोटींचा प्रस्ताव पालिकेने तयार केला होता. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर काम सुरू झाले आहे. पानवल धरण १९६५ ला बांधले आहे. शहराला प्रामुख्याने पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांपैकी हे एक आहे. शीळ, पानवल धरण व नाचणे तलाव या तीन जलस्त्रोतांतून पाणीपुरवठा होतो.
यापैकी पानवल धरणातील साठा दरवर्षी फेब्रुवारीअखेरीस संपुष्टात येतो. त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होतो. त्यानंतर शीळ धरणावर वाढत्या रत्नागिरी शहराच्या पाणीपुरवठ्याची भिस्त असते. पावसाळा सुरू होईपर्यंत शहराला पाणीपुरवठा करण्याची कसरत पालिका प्रशासनाला करावी लागते. सुधारित पाणीपुरवठा योजनेमुळे गळती कमी झाल्याने ताण कमी झाला आहे; परंतु शीळ धरणातील पाण्याच्या मर्यादित साठ्यामुळे पालिकेला पाणीपुरवठ्याची मोठी चिंता आहे. शहरापासून सुमारे १६ किमीवर पानवल धरण आहे. धरण १९५२ मध्ये मंजूर झाले. १९६५ मध्ये धरणाचे काम पूर्ण झाले होते. विजेसाठी एकही रुपया खर्च न करता केवळ नैसर्गिक उताराच्या आधाराने शहराला पाणीपुरवठा करणारे पानवल हे एकमेव धरण आहे. पानवल धरणातील पाणी नैसर्गिक उताराच्या आधाराने नाचणे येथील जलशुद्धीकरण केंद्रात येते.
शुद्धीकरण करून ते शहरवासीयांना पुरवले जाते. पानवल धरणातून शहराची पूर्ण गरज भागत नाही; परंतु काही महिने विनाखर्च शहराला पाणीपुरवठा करणारे हे धरण खूप उपयोगी मानले जाते. पानवल धरणात ५१८ द.ल.घ.मी. पाणीसाठा करण्याची क्षमता आहे. या पाण्याचा वापर शहरवासीयांना सहा महिने केला जातो. त्या कालावधीत शीळ धरणातून पाण्याची उचल कमी प्रमाणात केली जाते. त्यामुळे पालिकेला वीज बिलात मोठी कपात होते. निर्माण ग्रुपने हे काम घेतले असून, वर्षाची त्याला मुदत दिली आहे; परंतु मे महिन्यापर्यंत हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.
पाणीपुरवठा सुरळीत – काम पूर्ण झाल्यानंतर गळती थांबणार असून, जवळपास ०.३४१ दलघमी इतका साठा होणार आहे.त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे. या धरणातून पाणी ग्रॅव्हिटीने शहरात येत असल्याने विजेच्या बिलाची बचत होणार आहे. त्यामुळे नवीन पाईपलाईनही टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. पानवल धरणातून येणारे पाणी शुद्ध करण्यासाठी नाचणे येथील सुपलवाडी परिसरात नवे जलशुद्धीकरण केंद्र उभारले आहे. या धरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर रत्नागिरीकरांना मुबलक पाणी मिळणार आहे.