सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी मुंबई-गोवा महामार्गावरील अपूर्ण रस्त्यांची कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत असे निर्देश दिले आहेत. त्याप्रमाणे परशुराम घाटातील ग्रामस्थांचे स्थानांतरण करण्यासाठी २ कोटी रुपयांचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वर्ग केला आहे. तो तत्काळ संबंधितांना वितरित करण्यात यावा, असे निर्देश दिले आहेत. या महामार्गावरील इंदापूर ते झाराप दरम्यानच्या चौपदीकरणाचे काम जलद गतीने पूर्ण करावे. महामार्गावरील अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करून जनतेला तातडीने दिलासा द्यावा, अशा सूचना चव्हाण यांनी दिल्या आहेत.
महामार्गावरील परशुराम घाट, कशेडी घाट आदी घाटरस्त्याच्या लांबीतील उतारांचे स्थिरीकरण करून अपघातमुक्त करण्याबाबत तसेच हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासंदर्भात मंत्री चव्हाण यांनी सूचना दिल्या. या कामातील ज्या तांत्रिक व प्रशासकीय अडचणी असतील त्या दूर करण्याच्या दृष्टीने सर्वांनी तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देशही मंत्री चव्हाण यांनी दिले आहेत.
मुंबई-गोवा महामार्गावरील अपूर्ण राहिलेल्या कामासंदर्भात मंत्री चव्हाण यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकाऱ्यांसमवेत शासकीय निवासस्थानी आढावा घेतला. या वेळी चव्हाण यांनी पनवेल ते इंदापूर या मार्गावरील कासू ते इंदापूर टप्पा क्र. १, पनवेल ते कासू (वडखळजवळ) टप्पा क्र. २ आदी रस्त्यांची सद्यस्थिती, या मार्गावरील दुरुस्तीचे काम, त्याचप्रमाणे इंदापूर ते झाराप या रस्त्याचे बळकटीकरण व चौपदीकरणाचे कामाचा आढावा घेतला. ही सर्व कामे तंत्रज्ञानाचा वापर करून जलदगतीने पूर्ण करावेत, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. बरीच वर्ष रेंगाळलेल काम आता मार्गी लावणार असल्याचे दिसून येत आहे.