चिपळूण परिसरात वृक्षारोपणाविषयी चांगली चळवळ उभी राहात आहे. येथे वृक्षारोपण व निसर्ग संवर्धनाचे अनेक उपक्रम राबवले जातात. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मोठ्या पावसातही खास वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाला आले. त्यामुळे त्यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून वृक्षारोपण, देवरहाटी, बांबू लागवड व पाझर तलाव योजना राबवावी, असे प्रतिपादन आमदार शेखर निकम यांनी केले. ग्लोबल चिपळूण टुरिझमच्या वतीने आयोजित मियावाकी जंगल योजनेच्या तिसऱ्या टप्प्यातील वृक्षारोपणाचा कार्यक्रम शुक्रवारी सकाळी धामणवणे येथे झाला. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, माजी आमदार सदानंद चव्हाण, काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, राम रेडीज, शाहनवाज शाह, संजीव अणेराव आदी उपस्थित होते.
या वेळी आमदार निकम म्हणाले, मियावाकी जंगलाचा प्रयोग प्रथम ज्या वेळी येथे झाला त्या वेळी आपल्याच हस्ते वृक्षारोपण झाले. आज हे जंगल १५ ते २० फुटांनी वाढले आहे जि. प. ने देखील बांबू व वृक्ष लागवड मोहीम हाती घ्यायला हवी. निसर्गाचे संवर्धन झाले तरच भविष्यकाळ उज्ज्वल आहे. राष्ट्रीय महामार्गालगत देशी झाडे लावण्यात येत आहेत. त्यासाठी चिपळूणमध्ये उठाव झाला. धामणवणेसारखे गाव पर्यटनदृष्ट्या विकसित होऊ शकते. रस्ता रूंद झाल्यास धामणवणेमध्ये पर्यटन वाढेल.
येथे पाझर तलावासाठी आपण प्रयत्न करू यातून पाणीटंचाई दूर होईल. संजीव अणेराव यांनी मियावाकी जंगल म्हणजे काय ही संकल्पना मांडली. राम रेडीज यांच्या हस्ते उपस्थितांचा रोप देऊन सत्कार करण्यात आला. मियावाकी प्रकल्प ३ साठी वृक्षारोपण करण्यात आले. देशी झाडे लावण्यात आली. कार्यक्रमाला रमण डांगे, समीर कोवळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती यादव, विस्तार अधिकारी केळसकर, तालुका कृषी अधिकारी म्हेत्रे, अतिरिक्त बीडीओ कांबळे, धामणवणेचे ग्रामस्थ व शालेय विद्यार्थी उपस्थित होते.
वृक्षतोड बंदीचे ठराव करा – आज निसर्ग संवर्धनाची गरज आहे. पर्यावरण संरक्षण झाले तरच तापमानवाढ कमी होईल. ग्लोबल वॉर्मिंगमुळे दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे, पाणीटंचाई निर्माण होत आहे. अनेक गावात टँकर धावतात. धामणवणेमध्ये मियावाकी जंगलाचा प्रयोग होत आहे. असे प्रयोग अनेक ठिकाणी व्हावेत. ठिकठिकाणी जंगलतोड झाल्यामुळे मोठी हानी होत आहे. ग्रामपंचायतीने जंगलतोड बंदीचे ठराव गावागावांत करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांनी केले.