९ काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या तयारीला वेग आलेला आहे. ठिकठिकाणी सार्वजनिक गणेश मंडळाकडून मंडपाची उभारणी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांनी मंडप उभारणी, विद्युत रोषणाई, देखावे साकारताना विद्युत सुरक्षेबाबत विशेष दक्षता बाळगावी, असे आवाहन महावितरण कंपनीने केले आहे. गणेशोत्सव काळात ग्राहकांना सुरळीत व दर्जेदार वीजपुरवठा करण्यासाठी महावितरण यंत्रणा सज्ज आहे. संभाव्य विद्युत अपघातामुळे होणारी जीवित व वित्तहानी टाळण्याकरिता विद्युतसुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.
उत्सवासाठी मंडप उभारताना विद्युत रोषणाई, देखावे साकारताना, गणेशमूर्ती आणताना विद्युत यंत्रणेतील विद्युतवाहिन्या, वितरण रोहित्रे, विद्युतखांबास ताण दिलेली तार भूमिगत वाहिनींचे फिडर पिलर आदींपासून सुरक्षित अंतर राखणे आवश्यक आहे. विद्युतवाहिन्यांखाली मंडप उभारणी करण्यात येऊ नये. मंडपासाठी वापरण्यात येणारे लोखंडी गज, खांब, उभारताना ते विद्युतवाहिन्यांच्या सपंर्कात येणार नाहीत, यांची काळजी घ्यावी. वीजपुरवठा व जनरेटर असल्यास त्याकरिता स्वतंत्र न्युट्रल घेणे आवश्यक आहे. पाऊस- व वादळवाऱ्यानंतर मंडपातील विद्युतीकरण व रोषणाई हाताळताना तपासणी करून घ्यावी. गणेशमंडळांनी भाविक भक्तांच्या सुरक्षेच्यादृष्टीने विद्युतसुरक्षेबाबत तडजोड करू नये, असे आवाहन कंपनीने केले आहे.
गणेश मंडळांसाठी घरगुती दराने वीज – महावितरणकडून सार्वजनिक गणेश मंडळांना घरगुती दराने वीज आकारणी करण्यात येत आहे. तेव्हा मंडळांनी तात्पुरत्या स्वरूपातील वीजजोडणीसाठी आवश्यक कागदपत्रांसह नजीकच्या महावितरण कार्यालयास भेट द्यावी. विद्युत निरीक्षक यांची विद्युतसंच मांडणी परवानगी आवश्यक आहे. महावितरणकडून विभागीय कार्यालयात नियंत्रण कक्ष सुरू ठेवण्यात आले आहेत. आपत्कालीन स्थितीत जिल्हास्तरीय नियंत्रण रत्नागिरी (७८७५७६५०१८) कक्षाशी संपर्क साधावा.