जिल्ह्यात गेल्या सात महिन्यांमध्ये वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून गहाळ झालेले ४५ मोबाईल परत मिळविण्यास पोलिसांना यश आले आहे. रत्नागिरी सायबर पोलिसांसह वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांच्या कर्मचाऱ्यांनी ही कामगिरी केली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या हस्ते मूळ मालकांना हे मोबाईल परत करण्यात आले. हरवलेल्या अनेक मोबाईलबाबत जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांमध्ये तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्या तक्रारींबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, तसेच अपर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला.
जिल्ह्यामध्ये सप्टेंबर २०२३ ते मार्च २०२४ पर्यंत सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीमधून नागरिकांच्या गहाळ झालेल्या मोबाईलची माहिती घेण्यात आली. ती सायबर पोलिस ठाणे रत्नागिरीचे पोलिस निरीक्षक अमित यादव, सहायक निरीक्षक नितीन पुरळकर, पोलिस हवालदार दुर्वा शेट्ये, तांत्रिक विश्लेषण शाखेचे रमिज शेख, नीलेश शेलार यांनी तसेच रत्नागिरी शहर, लांजा, चिपळूण, राजापूर, सावर्डे, देवरुख या पोलिस ठाण्यांच्या पोलिस अंमलदार यांनी एकत्रित काम केले. प्राप्त माहितीच्या आधारे विविध पोलिस ठाणे येथे दाखल गहाळ मोबाईलचा शोध घेतला.
या प्रक्रियेमध्ये त्यांनी एकूण ४५ मोबाईलचा शोध घेतला. ते परत मिळविण्यात पोलिसांना यश आले आहे. हे गहाळ मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना, पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या हस्ते अधीक्षक कार्यालय येथे परत देण्यात आले. एकूण २७ मोबाईलच्या मालकांना त्यांचे मोबाईल परत देण्यात आले. उर्वरित सर्व मोबाईल मालकांना सायबर पोलिस ठाणे येथून घेऊन जाण्याबाबत अधीक्षक श्री. कुलकर्णी यांनी आवाहन केले आहे.