29.7 C
Ratnagiri
Saturday, May 17, 2025

कोयनेचे पाणी मुंबईत नेण्यासाठी भूगर्भ चाचणी

कोयना धरणातील वीजनिर्मितीनंतर शहरातील वाशिष्ठी नदीमार्गे अरबी...

राजापुरात वीज पडून दोघे जखमी; घराचे नुकसान

वळवाच्या पावसाने रत्नागिरी जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे....

जिल्हा पोलिस अधीक्षक कुलकर्णी यांची बदली…

कर्तव्यदक्ष जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची...
HomeRatnagiriगुढीपाडव्याच्या मुहूर्तावर वाशीत एक लाख ३२ हजार हापूस पेट्या

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर वाशीत एक लाख ३२ हजार हापूस पेट्या

५० टक्क्यांहून अधिक बागायतदारांनी पाडव्याला विक्रीचा मुहूर्त केला आहे.

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर कोकणचा हापूस बाजारात पाठविण्याची परंपरा यंदाही अनेक बागायतदारांनी जपली आहे. त्यामुळे सलग दोन दिवस वाशी बाजारात हापूसच्या ६७ हजार आणि ६५ हजार पेट्या दाखल झाल्या आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा दुप्पट पेट्या आल्याचे वाशीतील व्यावसायिकांनी सांगितले. हापूसचा दर ३०० ते ८०० रुपये डझन विकला जात असून तुलनेत पाचशे रुपयांनी कमी आहे. मात्र, मागील आठवड्यातील घसरण काही अंशी थांबल्यामुळे बागायतदारांना दिलासा मिळाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातून गुढीपाडव्याच्या मुहूर्ताला हापूस बाजारात विक्रीसाठी पाठविण्याची परंपरा आहे. त्यानंतर खऱ्या अर्थाने हंगाम सुरू होतो. परंतु यंदा फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यात रत्नागिरी, सिंधुदुर्गमधून तुलनेत सर्वाधिक हापूस वाशीसह पुणे, अहमदाबाद, पश्चिम महाराष्ट्रातील विविध बाजारात दाखल झाला. लवकर आणि मुबलक आंबा विक्रीसाठी आला होता.

५० टक्क्यांहून अधिक बागायतदारांनी पाडव्याला विक्रीचा मुहूर्त केला आहे. त्यांच्याबरोबर इतर बागायतदारांच्या मिळून सोमवारी (ता. ८) वाशी बाजारात दाखल झालेल्या ९२ हजार पेटीपैकी हापूसच्या ६७ हजार पेट्या आहेत. तर उर्वरित अन्य आंबे आहेत. मंगळवारी (ता. ९) ६५ हजार पेटी आंबा कोकणातून दाखल झाल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. पाडव्याला एक लाख पेटी कोकणातून पाठवली जाते, ही परंपरा यंदाही कायम असल्याचे आकडेवारी पाहता दिसून येते. गतवर्षी याच कालवधीत २९ हजार आणि ४० हजार पेट्या आल्या होत्या. मात्र कर्नाटकसह अन्य आंब्यांची आवक कमी होती.

यंदा हापूसची दुप्पट आवक आहे. दरम्यान, हंगामाच्या आरंभीला हापूसचा पेटीचा दर साडेसहा ते सात हजार रुपये होता. मात्र आवक वाढत गेली तसा दर कमी झाला. मार्चच्या पहिल्या आठवड्यात पन्नास टक्क्यावर दर आले. त्यामुळे आंबा बागायतदार हादरले होते. आवक वाढण्याबरोबरच निर्यात करण्यातील अडथळेही कारणीभूत असल्याची कारणे वाशीतील व्यावसायिकांनी पुढे केली होती. रत्नागिरीतील बागायतदारांनी व्यावसयिकांशी संवाद साधत दर स्थिर ठेवण्याची मागणी केली होती. त्यानंतर काही कालावधीसाठी पेटीचा दर ३७०० रुपयांपर्यंत राहिला. सध्या दर्जेदार आंब्याला डझनला ८०० रुपये दर मिळत असून सर्वात कमी वजनाच्या फळाला ३०० रुपये दर मिळत आहे. गतवर्षी पाचशे रुपये अधिक दर होता. मात्र तेव्हा आवक कमी होती, असे व्यावसायिकांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular