एकेकाळी भारत संचार निगमला म्हणजेच बीएसएनएलला सर्वाधिक उत्पन्न देणारा जिल्हा म्हणून रत्नागिरीची ओळख होती. आता या विभागात असलेल्या रिक्त पदांमुळे सेवा देण्यात अडचणी उभ्या राहत असून सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या येथील बीएसएनएलची अवस्था बिकट झाली आहे. रिक्त पदांसोबत त्याला भौगोलिक परिस्थितीही कारणीभूत असली तरी बीएसएनएलकडून काही योजना राबविल्यास गेलेला लौकिक पुन्हा मिळू शकतो. मात्र त्यादृष्टीने पावले उचलणे आवश्यक आहे. मात्र त्याच्यापुढे अडचणींचा डोंगर उभा आहे. रत्नागिरी जिल्ह्यात बीएसएनएलचे मोठे दूरध्वनी ग्राहक होते. बीएसएनएलचे जाळे खेड्यापाड्यांत चांगले विणले गेले होते. मात्र २०२० पासून बीएसएनएलने कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवृत्ती योजना आणली आणि त्याचा लाभ घेत अनेक कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. अगदी लाईनमन पासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत स्वेच्छानिवृत्ती घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश होता. जवळपास २५० च्या आसपास कर्मचारी आणि अधिकारी सेवानिवृत्त झाले.
त्यानंतर सध्या ४० अधिकारी आणि कर्मचारी काम पाहत आहेत. त्याचाही परिणाम सेवेवर झाला आहे. बीएसएनएलमध्ये सध्या करारावर अभियंता नियुक्त केले जात आहेत. म ात्र त्यांना भौगोलिक परिस्थिती माहिती नसते. त्यामुळे २ ते ३ वर्षांत बदली करून आपल्या गावी परतण्याकड़े त्यांचा कल असतो. त्यामुळे रत्नागिरीतील अभियंत्यांची पदे रिक्तच राहतात. नुकत्याच १० ते १२ बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून त्यांच्या जागी नविन अधिकाऱ्यांच्या नियुक्या झालेल्या नाहीत. काहींनी रत्नाागिरी जिल्ह्यात येण्यास उत्सुकता दाखवली नाहीः त्यामुळे रत्नागिरी विभागात जागा रिक्त आहेत. रिक्त पदांमुळे बीएसएनएलच्या सेवेवर परिणाम होत असतानाच भौगोलिक परिस्थितीमुळे बीएसएनएलपुढे अडचणी आहेत. दुर्गम आणि डोंगराळ भागात सेवा देणे हे आव्हान आहे. मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो, वादळ होते, विजांचा कडकडाट होतो, त्यामुळे बीएसएनएलच्या टॉवर्सचे मोठे नुकसान होते.
या टॉवर्ससाठी वापरली जाणारी महागड्या उपकरणांमध्ये बिघाड होतो. त्याचाही परिणाम ग्राहक सेवेवर होतो. आर्थिक नुकसान सोसावे लागते. तरीही प्रामाणिकपणे काम करणारे अनेक अभियंता, अधिकारी आणि लाईनमन त्यांच्यापरीने सर्व ते प्रयत्न करून सेवा सुरळीत करण्यासाठी झटत असतात. हा जिल्हा समुद्रकिनारी वसला आहे. समुद्राजवळील खारे पाणी आणि वाऱ्यामुळे बॅटऱ्या सातत्याने नादुरूस्त होतात. त्यामुळे अडचणी येतात. बीएसएनएलच्या केंद्रीय कार्यालयाने या समस्यांसाठी लक्ष द्यायला हवे. आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याबरोबरच रिक्त पदेही भरली जावीत अशी मागणी होत आहे. खा. नारायण राणे आणि खा. सुनील तटकरे यांनी या विषयात लक्ष घालावे अशी मागणी ग्राहकांकडून केली जात आहे.