हल्ली सर्वत्र एकत्रित मालमत्तेवरून सख्ख्या नात्यांमध्ये सुद्धा दरार आल्याचे दिसून येत आहे. कोरोना काळामध्ये अधिक करून गावाकडील जागा, त्यातील आपला हिस्सा आणि त्यावर खूप वर्षाने दाखविण्यात येणारा हक्क आणि वर्षोनुवर्षे गावाकडील सांभाळली जाणारी मालमत्ता हक्क सोडायला तयार नसणारे गावकरी नातेवाईक यामुळे अनेक वेळा नात्यांमध्ये वितुष्ट निर्माण होते. अशीच एक घटना खेद तालुक्यातील खोपी गावामध्ये घडली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तालुक्यातील खोपी गावातील रोहीदासवाडी येथे दि. १९ रोजी सकाळी ११.३० वाजता वडिलोपार्जित जागेच्या कुंपणाचे बांधकाम करीत असलेल्या चुलत पुतण्याला हरकत घेतली, याचा राग मनात धरून पुतण्याने काकाला लाकडी बांबूने मारहाण केल्याप्रकरणी खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकांची मानसिकता अशी सध्या बघायला मिळत आहे कि, वडिलोपार्जित मालमत्ता कालांतराने ढासळून गेली तरी हरकत नाही पण एकट्याला कोणाला मिळता कामा नये. परंतु हा विचार केला जात नाही कि, सर्वांनी मिळून ती सांभाळली पाहिजे. त्यासाठी एकत्रित आर्थिक पाठबळ दिले पाहिजे.
या घटनेची पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संदीप खोपकर वय ५५, रा. खोपी रोहीदास वाडी व शैलेश शांताराम खोपकर वय ३८, रा. खोपी रोहीदासवाडी हे नातेवाईक आहेत. संदीप याचा चुलत पुतण्या हा त्याच्या राहत्या घरा शेजारी वडिलोपार्जित जागेत शनिवारी कुंपणाचे बांधकाम करत होते. कामगार काम करत असताना संदीप याने कामास हरकत घेतली. याचा राग मनात धरून शैलेश खोपकर याने लाकडाच्या बांबूने संदीप याच्या डोक्यात, मनगटावर, पायावर मारून दुखापत करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली, असे संदीप याने तक्रारीत नमूद केले आहे.
या प्रकरणी संदीप यांचा पुतण्या संशयित शैलेश याचे विरूध्द येथील पोलिस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.