हवामान विभागाच्या अंदाजानुसार रत्नागिरी जिल्ह्यात ९ मेपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यात उद्यापासून दोन दिवसांत तुरळक ठिकाणी विजांच्या लखलखाटासह जोरदार पाऊस पडेल तर पुढे ११ ते १७ मे या काळात काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. उन्हाच्या कडाक्यामुळे सध्या बागायतदार हापूसच्या काढणीवर भर देत आहेत. यंदा कमी उत्पादन असल्यामुळे हंगाम १५ मेपर्यंतच राहील, अशी स्थिती आहे. त्यात पावसाने गोंधळ घातला, तर बागायतदारांना फटका बसू शकतो.
कोकण कृषी विद्यापीठाकडून आलेल्या अंदाजानुसार, कोकणात पुढील पाच दिवसांत पावसाची शक्यता आहे. या कालावधीत कमाल तापमान ३५ डिग्री सेल्सिअस, तर किमान तापमान २५ अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता आहे. यंदा मोसमी पावसाचे आगमन लवकर होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. यंदाचा उन्हाळा अधिक तीव्र उष्म्याचा असल्याचे जाणवत आहे. दुपारच्या सुमारास उन्हातून बाहेर पडणेही मुश्कील होत आहे. त्यामुळे शहरात गजबजणाऱ्या रस्त्यावरही वाहनांची गर्दी कमी दिसते. कडकडीत उन्हामुळे रत्नागिरीकरांना पावसाची प्रतीक्षा आहे.
मार्च, एप्रिल व मे हे तीन महिने हापूस आंबा हंगामाचे म्हणून ओळखतात. सध्या जिल्ह्यात सर्वत्रच हापूस आंब्याच्या काढणीकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. हंगाम शेवटच्या टप्प्याकडे आला असून, हाती आलेल्या पिकापासून जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यावर भर आहे. काही बागायतदारांकडील आंबा संपुष्टात आला आहे. त्यांनी कामगारांनाही घरी पाठवण्यास सुरुवात केली आहे. वाशी बाजारातही रत्नागिरी जिल्ह्यातून जाणाऱ्या हापूसची आवक कमी झालेली पाहायला मिळत आहे. सध्या वाशीत ३ मे रोजी ४४ हजार, तर ४ रोजी ५३ हजार पेटी दाखल झाली होती. तुलनेत अन्य राज्यातील आंब्याच्या पेट्यांचे प्रमाण अधिक वाढलेले आहे.
आंबा तोडीवर भर – कॅनिंगला चाळीस रुपयांपर्यंत किलोला दर मिळत आहे. या परिस्थितीत पावसाचे आगमन झालेच, तर फूलकिडीचे संकट बागायतदारांपुढे राहणार आहे. डागी आंबा वाढण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्याचा दर्जावर परिणाम होत असल्याने बागायतदार पावसाची शक्यता लक्षात घेऊन जास्तीत जास्त आंब्यांची तोड करून तो बाजारात पाठवण्यावर भर देत आहेत.