राज्यात टोलचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. राज्यातील विविध टोलच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसे शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोलमधून खासगी वाहनांना वगळावं, अशी मागणी शिंदे सरकारकडे केली. ‘जनता रोड टॅक्स देते, मग टोलचा भार कशाला, असा रोखठोक सवाल देखील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला. टोलच्या मुद्द्यावरून राज ठाकरे यांनी अनेक प्रश्नांचा भडीमार शिंदे सरकारला केला.
टोल नाक्यांवर सुविधांचा अभाव का आहे? तसेच महिलांसाठी शौचालय का नाही, असा सवाल देखील राज ठाकरे यांनी केला. रस्त्यांच्या अवस्थेवरही राज ठाकरे यांनी सवाल उपस्थित केला. राज ठाकरे यांच्या मागणीनंतर मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आरटीओ विभागाच्या ठाणे पासिंग असलेल्या चक ०४ क्रमांकाच्या वाहनांना टोल माफ करण्याचा विचार सुरु आहे. याबाबत लवकर निर्णय घेऊ, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे.
राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीत अजून एका महत्वाचा मुद्द्यावर चर्चा झाली. ३३ अ योजनेअंतर्गत पूर्ण राज्यभरातील पोलिसांना हक्काची घरं मिळण्याबाबत चर्चा झाली. पोलिसांना १५ हजार घरे देण्याची मागणी ठाकरेंनी यावेळी केली. राज ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्री यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली. या बैठकीनंतर त्यांनी शुक्रवारी सकाळी ८ वाजता संबधित लोकांसोबत बैठक आयोजित केली आहे. त्यानंतर मी सकाळी १० वाजता प्रसारमाध्यमांशी बोलेल. पोलिसांच्या घरांचाही प्रश्न चर्चे त आला, त्याच्यावरही उद्याच बोलेन’, असे सांगितले.