राज्याच्या राजकारणात कायमच विचारला जाणारा प्रश्न म्हणजे ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार का? यावर राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे ‘त्यांना येऊ देत, साद घातली तर बघू’, असं उत्तर देऊन तिथून निघून गेल्या. शर्मिला ठाकरेंच्या या विधानानंतर कुठेतरी राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याचे संकेत दिसून आल्याने पुन्हा एकदा शिवसेना आणि मनसेच्या युतीबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत.
हिप बोनच्या शस्त्रक्रियेनंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा राजकारणाच्या मैदानात उतरले आहेत. सोमवारी मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिर येथे राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकारिणीच्या बैठक पार पडली. यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांची प्रतिक्रिया ताजी असतानाच आता राज ठाकरेंचे शिलेदार आणि मनसे नेते बाळा नांदगावकर यांनीही उत्तर दिलंय. दोन ठाकरे एकत्र येण्याबाबत राज ठाकरे स्वतःच बोलतील, यावर भाष्य करणं उचित नाही, हा प्रयोग मी आधी करून झालोय, असं नांदगावकर म्हणाले.
शर्मिला ठाकरेंच्या विधानावर ठाकरे गटातील आमदार भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शर्मिला ठाकरे हे काय बोलल्या, ते काही मी ऐकलं नाही. तसेच कोणाच्या घरगुती विषयांबाबत आमच्यासारख्या व्यक्तीनं बोलणं योग्य नाही. मात्र आज ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरेंना सर्व बाजूनं घेरण्याचा जो प्रयत्न सुरु आहे. अशावेळी उद्धव ठाकरेंच्या बाजूनं महाराष्ट्र उभा आहे. अशावेळेला जर त्यांचे कुटुंबिय, त्यांचे नातेवाईक, कोणत्याही गोष्टीचा राग मनात न ठेवता जर उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे उभे राहिले, तर माझ्यासारख्या सामान्य माणसाला त्याचा नक्कीच आनंद होईल, असं मत भास्कर जाधव यांनी व्यक्त केलं आहे.